Corona virus impact:ग्रामीण भागातील संसर्ग थोपवा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

ग्रामीण भागातील संसर्ग थोपवा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

कोविड १९ बाबत आढावा

अकोला: महापालिका भागातील संसर्ग थोपविण्यास बऱ्यापैकी यश येत असल्याचे दृष्टिपथात दिसत आहे. त्याच वेळी ग्रामिण भागात वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. तेव्हा ग्रामिण भागात गटविकास अधिकारी व लहान शहरांचे न.पा. मुख्याधिकारी यांनी संयुक्तपणे कृती आराखडा तयार करुन ग्रामिण भागातील वाढता संसर्ग थोपवावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षणमहिला व बालविकास इतर मागासवर्गसामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गविमुक्त जातीभटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याणकामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले.

येथील  नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत कोविड १९ बाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच सर्व तहसिलदार, न. पा मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.


यावेळी ना. कडू यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्ह्यातील अकोला महापालिका हद्दीत रुग्ण संख्या आटोक्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील ग्रामिण व लहान शहरांच्या भागात  रुग्ण संख़्येत वाढ होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.  यावेळी ना. कडू म्हणाले की, रुग्ण संख़्या थोपविण्यासाठी संपर्क शोधणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज पॉझिटीव्ह आलेला रुग्ण या आधी कुणा कुणाच्या संपर्कात होता, त्या व्यक्तिंचा शोधून त्यांचे अलगीकरण करणे व चाचण्या करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपण त्यांच्या संभाव्य संपर्कातून होणारा फैलाव रोखू शकतो. ग्रामिण भागात होत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावरुन एक नोडल अधिकारी नेमण्यात यावा. या अधिकाऱ्यांने सर्व आढावा दैनंदिन घ्यावा. ‘रॅपिड टेस्ट’द्वारे जे जादा लोकांच्या संपर्कात येतात असे दुकानदार, भाजीपाला विक्रेते, रेशनदुकानदार यांच्या चाचण्या करुन घ्या. तसेच ज्या गावांची लोकसंख्या जादा आहे अशा किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना, रॅपिड टेस्ट करण्याचा आराखडा तयार करुन अंमलबजावणी करा,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

.........

टिप्पण्या