spurious-seeds-farmer-akola: बोगस बियाण्यांप्रकरणी शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची आमदार पिंपळे यांची मागणी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आमदार पिंपळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


बैठकीनंतर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी विभाग, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा आणि संबंधित बियाणे कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहे. 


कृषी विभागाकडे शुक्रवारपर्यंत सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण 1,722 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 1,000 तक्रारी मूर्तिजापूर तालुक्यातील असल्याचे पिंपळे यांनी सांगितले. बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.


यावेळी पिंपळे यांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि तालुका गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. आतापर्यंत जिल्ह्यातील 183 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे सांगत कृषी विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे हे अपयश असल्याची टीका त्यांनी केली.



दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच पुढील वर्षी अशा कंपन्यांचे बियाणे विक्रीस परवानगी देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.याशिवाय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचा आरोप करत काही अधिकाऱ्यांचे कंपन्यांशी लागेबांधे असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.



शेतकऱ्यांना तीन दिवसांच्या आत मदत जाहीर करावी, तसेच गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही हरीश पिंपळे यांनी केली आहे.



टिप्पण्या