election 2025: राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान; 3 डिसेंबर रोजी मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू, पातूर नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया प्रलंबित
भारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई: राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
श्री. वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल.
नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.
मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल.
मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.
पातूर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित
राज्यातील एकूण 247 पैकी 246 नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी 10 नवनिर्मित नगरपरिषदा आहेत. उर्वरित सर्व 236 नगरपरिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे पातूर (जि. अकोला) नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचबरोबर एकूण 147 पैकी 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी 15 नवनिर्मित; तर उर्वरित सर्व 27 नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. 105 नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याही प्रतिनिधींशीही संवाद साधण्यात आला आहे. असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
एकापेक्षा अधिक मते देणे अपेक्षित
नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यी पद्धती असून एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकूण सदस्य संख्येचा विषम आकडा असलेल्या नगरपरिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. त्याचबरोबर थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होत असल्याने साधारणत: एका मतदाराने तीन ते चार जागांसाठी मत देणे अपेक्षित आहे. एका नगरपरिषदची एकूण सदस्य संख्या कमीत कमी 20 ते 75 पर्यंत असते. नगरपंचायतीची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होत असली तरी नगरपंचायतीच्या मतदारानेदेखील दोन मते देणे अपेक्षित आहे. एक मत सदस्यपदासाठी; तर दुसरे मत थेट अध्यक्षपदासाठी द्यावे लागेल. सर्व नगरपंचायतीमध्ये सदस्यपदाच्या 17 जागा असतात.
जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा
राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मूभा देण्यासाठी शासनाने संबंधित अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र, असा उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.
मतदान केंद्र आणि ईव्हीएम
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असून त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. अन्य निवडणुकांच्यादृष्टीनेदेखील पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादा वाढविली आहे. ती पुढलीप्रमाणे:
‘अ’ वर्ग नगरपरिषद: थेट अध्यक्ष- 15,00,000, सदस्य- 5,00,000.
‘ब’ वर्ग नगरपरिषद: थेट अध्यक्ष- 11,25,000, सदस्य- 3,50,000
आणि
‘क’ वर्ग नगरपरिषद: थेट अध्यक्ष- 7,50,000, सदस्य- 2,50,000.
नगरपंचायत: थेट अध्यक्ष- 6,00,000, सदस्य- 2,25,000.
मतदारांसाठी संकेतस्थळ
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेत स्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच नाव शोधता येईल. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.
मतदारांसाठी नवीन मोबाईल ॲप
मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिक समजू शकते. ही माहितीसुद्धा या ॲपमधून मिळू शकेल.
मतदार जागृती
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश संबंधित सर्व जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांबरोबरच नवीन माध्यमांचा कौशल्यापूर्ण वापर करण्याबाबत आयोगाने 12 जून 2025 रोजी पत्राद्वारे सर्वांना निर्देश दिले आहेत. मतदार जागृतीसंदर्भातील सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण उपक्रम सूचल्यास तेही आपापल्यास्तरावर राबविण्याबाबत कळविले आहे.
संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
मतदान केंद्रावरील सुविधा
मतदान केंद्रावर दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आदींना प्राधान्याने मतदान करून दिले जाईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलबद्ध करून दिली जाईल. संबंधित ठिकाणी कृष्ठरोग्यांसाठी वेगळे वसतिगृह/ आश्रम असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यास हरकत नसेल. तिथे उपलब्धतेनुसार डॉक्टरांची नेमणूक केली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकचे असेल; परंतु शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी- कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल.
मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी
मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये; परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल दूरध्वनी जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष असेल.
मनुष्यबळाची व्यवस्था
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे 66,775 इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे. महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक मनुष्यबळाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांसोबतदेखील बैठकी आयोजित करून मनुष्यबळाबाबत नियोजन केले आहे.
आचारसंहिता
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा व नगरपंचातींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आजच (ता. 4 नोव्हेंबर 2025) दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्हानिहाय नगरपरिषदा व नगरपंचायती (न.पं.)
पालघर- डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा (न.पं).
रायगड- अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड- जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण (न.प.).
रत्नागिरी- चिपळूण, देवरुख (न.पं.), गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर आणि रत्नागिरी.
सिंधुदूर्ग- कणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला.
ठाणे- अंबरनाथ आणि कुळगाव- बदलापूर.
अहिल्यानगर- देवळाली- प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.) (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर.
धुळे- दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा (न.पं.) आणि शिरपूर- वरवाडे.
जळगाव- जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी (न.पं.), वरणगाव आणि यावल.
नंदूरबार- शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा.
नाशिक- भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपूरी, ओझर, पिंपळगांव- बसवंत आणि त्र्यंबक.
कोल्हापूर- आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव.
पुणे- आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी- उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव- दाभाडे आणि वडगाव (न.पं.).
सांगली- आष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा (न.पं.), तासगाव आणि विटा.
सातारा- कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा आणि वाई.
सोलापूर- अक्कलकोट, अकलूज, अनागर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला.
बीड- अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव आणि परळी- वैजनाथ.
छत्रपती संभाजीनगर- फुलब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर.
धाराशिव- भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर आणि उमरगा.
हिंगोली- बसमतनगर, हिंगोली आणि कळमनुरी.
जालना- अंबड, भोकरदन आणि परतूर. लातूर- अहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर (न.पं.) आणि उदगीर.
नांदेड- बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा.
परभणी- गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ.
अकोला- अकोट, बाळापूर, बार्शी- टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा.
अमरावती- अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट आणि वरुड.
बुलढाणा- बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव आणि सिंदखेडराजा.
वाशीम- कारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड आणि वाशीम.
यवतमाळ- आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर- नबाबपूर आणि पांढरकवडा.
भंडारा- पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा.
चंद्रपूर- बल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा.
गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली.
गोंदिया- गोंदिया, गोरेगाव (न.पं.), सालेकसा (न.पं.) आणि तिरोडा.
नागपूर- बहादुरा (न.पं.), बेसा पिपळा (न.पं.), भिवापूर (न.पं.), बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर- ब्रह्मणी, कामठी, कांद्री- कन्हान (न.पं.), काटोल, खापा, कोंढाळी (न.पं.), महादुला (न.पं.), मोहपा, मौदा (न.पं.), नरखेड, निलडोह (न.पं.), पारशिवणी (न.पं.), रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, बिडगाव- तरोडी (खू) पांढुर्णा (न.पं.), गोधणी रेल्वे (न.पं.), कन्हान- पिपरी, मोवाड, वाडी आणि येरखेडा (न.पं.).
वर्धा- आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे आणि वर्धा.
महत्वाच्या तारखा
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर 2025
नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 18 नोव्हेंबर 2025
अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- 21 नोव्हेंबर 2025
अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025
मतदानाचा दिवस- 02 डिसेंबर 2025
मतमोजणीचा दिवस- 03 डिसेंबर 2025
एकूण मतदार व मतदान केंद्र
पुरुष मतदार- 53,79,931
महिला मतदार- 53,22,870
इतर मतदार- 775
एकूण मतदार- 1,07,03,576
एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355
एकूण जागा आणि आरक्षित जागा
निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा- 246
निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- 42
एकूण प्रभाग- 3,820
एकूण जागा- 6,859
महिलांसाठी जागा- 3,492
अनुसूचित जातींसाठी जागा- 895
अनुसूचित जमातींसाठी जागा- 338
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 1,821
नगरपरिषद/ नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या
पालघर- 4
रायगड- 10
रत्नागिरी- 7
सिंधुदूर्ग- 4
ठाणे- 2
कोकण विभाग एकूण- 27
अहिल्यानगर- 12
धुळे- 4
जळगाव- 18
नंदूरबार- 4
नाशिक- 11
नाशिक विभाग एकूण- 49
कोल्हापूर- 13
पुणे- 17
सांगली- 8
सातारा- 10
सोलापूर- 12
पुणे विभाग एकूण- 60
छत्रपती संभाजीनगर- 7
बीड- 6
धाराशिव- 8
हिंगोली- 3
जालना- 3
लातूर- 5
नांदेड- 13
परभणी- 7
छत्रपती संभाजीनगर एकूण- 52
अमरावती- 12
अकोला- 6
बुलढाणा- 11
वाशीम- 5
यवतमाळ- 11
अमरावती विभाग एकूण- 45
भंडारा- 4
चंद्रपूर- 11
गडचिरोली- 3
गोंदिया- 4
नागपूर- 27
वर्धा- 6
नागपूर विभाग एकूण- 55
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा