नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राज्यातील महायुती शासनाने कास्तकारांच्या समस्यांना मोठा वाव दिला असून अद्यापही कास्तकार व कृषी जगताच्या समस्या अनंत वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढायला लागल्या आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी ही कास्तकारांची प्रलंबित मागणी ही हे महायुती शासन पूर्ण करू शकले नाही. म्हणून या महायुती शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात आगामी 15 सप्टेंबर रोजी नाशिक येथे महाविकास आघाडीचा भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.
स्थानीय शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या महायुती शासनाचे वाभाडे काढलेत.
ते म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याच्या कास्तकारी व कृषी क्षेत्राचे अनेक प्रश्न प्रलंबित असून बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. सरकारचे जिल्ह्याच्या सर्वकष विकासावर लक्ष नसून रुग्णालयात औषधांचा ठणठणात झाला आहे. महागाई व बेरोजगारीने उच्चांक घातल्यामुळे जनतेत या महायुती सरकार प्रती तीव्र रोष व्यक्त होत आहे. राज्यात शासकीय भरती झाली नसून युवक युवतीमध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुण आंदोलन करण्यासाठी पुढे धजावत असून शासनाचे अधिकारी सरकारच्या दडपणाखाली काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. अकोला जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी आपण अगत्याने जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आ शिंदे पुढे म्हणाले, सरकारने कामगारांच्या कामाचे तास बारा केले आहेत. यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार असून या 12 तास प्रणालीमुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचा अवमान होत असून राज्यघटनेने कामगारांना आठ तासाच्या कामाची मुभा दिली आहे. सरकारच्या या बेताल बारा तासाच्या धोरणामुळे सर्वत्र बेरोजगारी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची व्यापक जनसंपर्क करीत ताकद वाढवून व्यापक जन अभियान साकार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री व पक्षाचे विदर्भ प्रभारी राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगर अध्यक्ष रफीक सिद्दिकी, प्रदेश उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थी, प्रदेश सरचिटणीस प्रा विश्वनाथ कांबळे, जिल्हा निरीक्षक पांडुरंग ठाकरे, महानगर निरीक्षक गणेश राय, जिल्हा समनव्यक दिलीप आसरे, जिल्हा महासचिव आनंद पिंटू वानखडे, महानगर कार्याध्यक्ष देवानंद टाले आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा