scheduled-tribes-commission: आता आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण होणार - आदिवासी आघाडी प्रमुख उमेश पवार यांचा विश्वास



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज्यात ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल जिल्ह्यातील एक लाख 35 हजार आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करीत आहोत, असे  भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष उमेश पवार यांनी शुक्रवारी सांगितले. 



महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचलून या आयोगासाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद ही केल्याबद्दल आदिवासी मंत्री अशोक उईके , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानले.  सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेत उमेश पवार बोलत होते. 



यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी, माजी पंचायत समिती सभापती सुलभा सोळंके, विजय हळदे, गोपाल मोहोळ,  विनोद कोपरखेड, रोशन सोनवणे विशाल भारसाकडे, देवा भारसाकडे, देवानंद चव्हाण, संजय भिले, सोपान तोडसाम, बाळकृष्ण भलगडे, विठ्ठल सोळंके, विजय खुडे, निलम वरठे  आदी उपस्थित होते. 



या आयोगामुळे आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्कांचे रक्षण होण्यास मदत होईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 



यावेळी उमेश पवार म्हणाले की, या आयोगाचा मोठा लाभ आदिवासी समाजाला होणार आहे. एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य या आयोगात कार्यरत रहाणार असून त्यासाठी येणा-या खर्चास मान्यता देखील देण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा आयोग काम करणार आहे. आदिवासी समाजाच्या प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि स्थानांतर विषयीच्या सर्व समस्या शासनापुढे मांडण्याचे मोलाचे काम आयोग करेल असेही त्यांनी नमूद केले. शासन, आदिवासी समाज आणि प्रशासन यातील महत्वाचा दुवा म्हणून ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ येणा-या काळात काम करेल असा विश्वासही उमेश पवार यांनी बोलून दाखवला. 




अकोला जिल्ह्यात आदिवासी समाजाची अनेक समस्या निराकरणासाठी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल सातत्याने प्रयत्नशील असल्याची सांगून 11 जून रोजी राज राजेश्वर नगर विकास संवाद सभेला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषा सोबत वाजत गाजत येतील, असे देखील उमेश पवार यांनी सांगितले 




टिप्पण्या