amarvel-weed-management-: अमरवेल तणाचे व्यवस्थापन एकात्मिक करा- डॉ.विकास गौड यांचे आवाहन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ‘तण खाई धन’ या उक्ती नुसार विविध तणांच्या प्रादुर्भावमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान शेतकरी बांधवांना सर्वश्रुत आहे. याच मालिकेतील अमरवेल हे तण सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या तणांशी साधर्म्य साधणारे नसून प्रादुर्भावाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याचे वेगळेपण सिद्ध होते. बहुतांशी तणांप्रमाणे अमरवेल सारख्या लागट तणाचे नियंत्रण करणे जिकरीचे ठरते. परिणामी शेतकरी बांधवांना पिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते. म्हणूनच अमरवेल या परोपजीवी तणाचे योग्य वेळी प्रभावी नियंत्रण करण्यासाठी या तणाची जीवशास्त्रीय दृष्ट्या महिती करून घेणे आवश्यक ठरते. 



अमरवेल वनस्पती कंदमुळे वर्गातील, पर्णहीन पिवळसर रंगाची असून हिच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असल्याने उपजिविकेसाठी व्दिदल पिकांवर पूर्णतः अवलंबून राहते. परोपजिवी असल्यामुळे व्दिदल पिकासोबत व्दिदल तणांवर (तरोटा, रेशिमकाटा, गोखुरू, हजारदानी, बावची इ.) देखील स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करते. 



अलीकडे विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. त्याचप्रमाणे मूग, उडीद, कपाशी, हरभरा, जवस, कांदा तसेच मिरची पिकावर देखील अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 


विदर्भामध्ये दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवड क्षेत्रात झपाटयाने वाढ होत आहे. सोयाबीन पिकातील विविध तणांच्या व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर प्रभावी ठरत आहे. मात्र तरीही मागील काही वर्षात अमरवेल किंवा अधरवेल या परोपजिवी तणाचा प्रादुर्भाव व्दिदलवर्गीय पिकांवर मोठया प्रमाणात वाढत आहे. 


बाल्यावस्थेत  हा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिटकतो व जमिनीपासून वेगळा होतो. त्यानंतर सुक्ष्म दातासारख्या तंतूच्या मदतीने त्या वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. परीणामी उत्पादनात मोठी घट येते.


अमरवेलीची ओळख व वैशिष्टे :

  अमरवेल 

अमरवेलाचे बी २० वर्षांहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बिजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा  बंदोबस्त करणे आवश्यक आहे. 

या तणांच्या बी ला उगवणीसाठी अनुकूल १५ ते ३८ अंश सेल्सियस तापमान मिळताच त्याची उगवण होते. 

बी आकाराने १.० ते १.५ सें.मी. इतके असते. वेल पूर्णतः मुळरहित असून पिवळसर, नारिंगी व पानेरहित दो-यासारखा दिसतो.



मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून २.५ ते ५.० सें.मी. दुरवरील व्दिदल वनस्पतीवर चिकटतो. परंतू परीसरात व्दिदल वनस्पती नसली तरी त्याचे रोप ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहु शकत नाही. 



एक अमरवेल प्रतीदिन साधारण ७ सेंमीपर्यंत वाढून जवळपास ३ चै.मी. क्षेत्र व्यापतो.



साधारणतः ६० व्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची क्रिया सुरू होते.

या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे १०० टक्के देखील नुकसान होऊ शकते. मुग व उडीद ३१-३४ टक्के, टोमॅटो ७२ टक्के, हरभरा ८५.७ टक्के  व मिरची पिकामध्ये ६० ते ६५ टक्के उत्पादनात घट आढळून आली आहे.


व्यवस्थापन

अमरवेल या तणाच्या प्रभवी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामुहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनीक पध्दतीचा  वापर फायदेशीर ठरतो.


(अ) प्रतिबंधात्मक उपायः 


पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणविरहित बियाण्यांचा वापर करावा. 


पूर्ण कुजलेल्या शेण खताचा वापर करावा. 


विशेषतः शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून अथवा जाळून नष्ट करावा. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहतो. 


प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ करूनच त्याचा पुन्हा वापर करावा.


(ब) निवारणात्मक उपायः 


       

१. मशागतीय पध्दत

जमिनीची खोल नांगरणी करावी, बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने ८ सें.मी. पलीकडे अमरवेलीची उगवण होत नाही.


जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. नियमित डवरणी व निंदनी करून पीक तणविरहीत ठेवावे. 


पिकांची फेरपालट करावी, प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी.


अमरवेल ८-१० दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकांची लागवड तणनियंत्रण पध्दतींचा  अवलंब केल्यानंतर ८-१० दिवसांनी करावी.


२. रासायनिक व्यवस्थापन: 


सोयाबीन, भुईमुग, कपाशी, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक, पेंन्डिमिथॅलीन (३८.७ टक्के सी.एस.) (एकरी ७०० मि.ली. प्रती एकर).


सोयाबीन पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक, डिक्लोसुलम + पेंडीमेथालिन (०.९% + ३५% एस.ई.) (१००० मिली प्रती एकर) किंवा पेंडीमेथालिन + इमाझेथापीर (३०% + २% ई.सी.) (१२०० मिली प्रती एकर) याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी फवारणी करावी. 


कपाशी पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक, पायरिथिओबॅक सोडियम + पेंडीमेथालिन (३.१% + ३४% झे.सी.)  (८०० मिली प्रती एकर) याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी फवारणी करावी. 


अश्या प्रकारे एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन करण्याचे आवाहन अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे प्रमुख डॉ.विकास गौड यांनी केले आहे.


टिप्पण्या