maharashtra-temple-trust-akl: अंत्री मलकापूर येथे ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषद संपन्न; चारशेहून अधिक मंदिरांचे विश्‍वस्तांचा सहभाग



ठळक मुद्दा

हिंदू मठ मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ् बोर्ड व वक्फ् कायद्यात सुधारणा नव्हे तर ते रहित झाले पाहिजे! श्री सुनील घनवट.-राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे लक्षात आले की मठ मंदिरांच्या जागांवरती वफ्क् बोर्डचा दावा लावलेला आहे त्यामुळे मठ मंदिरांना अडचण निर्माण झालेली आहेत आणि असे चालू असलेले षडयंत्र रोखण्यासाठी वफ्क् बोर्ड आणि वफ्क कायदाच रहित झाला पाहिजे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केले. 


पुढे बोलताना ते म्हणाले  मंदिरांच्‍या संदर्भात खोटे कथानक (नॅरेटीव) सिद्ध करून पसरवले जातात. ते खोडून काढण्‍यासाठी लोकांपर्यंत खरी वास्‍तविकता पोचोवण्‍यासाठी सर्व विश्वस्तांनी व मंदिर प्रेमींनी  सिद्ध असायला पाहिजे. कोणत्‍याही धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्‍याचा कायद्याच्‍या दृष्‍टिकोनातून अधिकार नाही. त्‍यामुळे सरकारच्‍या नियंत्रणात असलेली सर्व मंदिरे ही सरकारमुक्‍त करून भक्‍तांच्‍या कह्यात देण्‍यासाठी राष्‍ट्रीय स्‍तरावरील जन आंदोलनात सहभागी व्‍हा, असे आवाहन मंदिर महासंघाचे राष्‍ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.  


२८ मार्च यादिवशी अंत्री मलकापूर (ता. बाळापूर, जिल्‍हा अकोला) येथील स्‍वयंभू महादेव मंदिर येथे स्‍वयंभू महादेव मंदिर अंत्री मलकापूर, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ, श्री चंडिका देवी संस्‍थान कुरणखेड आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्‍त वतीने ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषदे’चे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्‍थिती होती. या अधिवेशनाला अंत्री महादेव संस्‍थानचे अध्‍यक्ष अरविंद देठे, महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे श्री. अनुप जयस्‍वाल, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्‍वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, ह.भ.प. श्री. रमेश इस्‍लापे (पारस), ह.भ.प. वासुदेवराम महल्ले, अकोला, श्री. शुकदास गाडेकर (श्री गुरुदेव सेवा आश्रम पारसुल), श्री उज्‍ज्‍वल देशमुख (कुरणखेड महादेव संस्‍थान), श्री. तुळसीराम ईस्‍तापे, श्री. महेश गाडे, मुंडगाव ,ह.भ.प.श्रीकांत महाराज राऊत आदी मान्‍यवरांसह अकोला जिल्‍ह्यातील ४०० हून अधिक मंदिरांचे विश्‍वस्‍त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्‍या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्‍ते आणि मंदिर अभ्‍यासक सहभागी झाले होते.



परिषदेचा आरंभ वेदमंत्रपठणाने करण्‍यात आला. त्‍यानंतर स्‍वामी परमहंस राम भारतीजी महाराज, श्री चंडिकादेवी संस्‍थान, कुरणखेडचे अध्‍यक्ष श्री. प्रशांत भाऊ देशमुख, पू. अशोक पात्रीकर, स्‍वयंभू महादेव मंदिर अंत्रीचे उपाध्‍यक्ष श्री. किशोर कापडे आणि मंदिर महासंघाचे राष्‍ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांच्‍या शुभहस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

या मंदिर परिषदेला संबोधित करतांना श्री. घनवट पुढे म्‍हणाले, ‘‘मंदिरे ही सनातन धर्मप्रचाराची तसेच धर्मनिती ठरवण्‍याची केंद्र झाली पाहिजे. मंदिरे ही भक्‍त आणि देवता यांना जोडणारा दुवा आहे. त्‍यामुळे मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि तेथील उर्जा टिकून ठेवणे, हे विश्‍वस्‍तांचे कर्तव्‍य आहे. हिंदु मठ- मंदिरांच्‍या जागेवर दावा लावणारे वक्‍फ बोर्ड आणि वक्‍फ कायदा रहित झाले पाहिजे.’’ 



मंदिर संघटनेच्या कार्यात युवकांचा सहभाग  करून घ्यावा- परमहंस स्वामी राम भारती  महाराज संन्यास आश्रम, चांगेफळ

     

आम्ही युवकांना मोठ्या प्रमाणात रामकथेशी जोडले आहे. काकड  आरतीसाठी पहाटेला आमच्याकडे १००० ते १५०० तरुणांचा सहभाग असतो.


मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी संघटितपणे कार्य केल्‍यास मोठा दबाव गट निर्माण होईल ! -  प्रशांत देशमुख, अध्‍यक्ष, श्री चंडिका देवी संस्‍थान, कुरणखेड 


देवळांमुळे हिंदु संस्‍कृती आणि परंपरा यांचे जतन अन् संवर्धन होते. त्‍यामुळे सामाजिक जीवनात मंदिराचे अनन्‍यसाधारण स्‍थान आहे. हे लक्षात घेऊन एकट्या दुकट्याने मंदिर चालवण्‍यापेक्षा सर्व मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’च्‍या अंतर्गत संघटितपणे कार्य केल्‍यास मोठा दबावगट निर्माण होईल. त्‍यामुळे आपल्‍या सर्व मंदिरांचा विकास करणे शक्‍य होईल.


भाविकांना आध्‍यात्‍मिक लाभ होण्‍यासाठी मंदिराचे सुव्यवस्थापन आवश्‍यक ! - अरविंद देठे, अध्‍यक्ष, अंत्री महादेव संस्‍थान


मंदिरातील स्‍वच्‍छता हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्‍यासाठी  मंदिर विश्‍वस्‍तांनी प्रयत्नशील असायला हवे. त्‍यामुळे भक्‍तांना मंदिराचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ होऊ शकतो. यासमवेतच मंदिर विश्‍वस्‍तांनी सामूहिक आरती, संतांचे मार्गदर्शन, धर्मशिक्षण वर्ग यांचे नियमित आयोजन करावे, तसेच महापुरुष आणि अध्‍यात्‍म यांची माहिती देणारे फलक मंदिरात लावल्‍यास भाविकांमध्‍ये जागृती होईल. 



मंदिर हे केवळ उपासनेचे नव्‍हे, तर हिंदू संघटनाचे केंद्र आहे ! - पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रसारक संत, सनातन संस्‍था 

मंदिरे ही अध्‍यात्‍म आणि धर्म यांची योग्‍य सांगड घालणारी केंद्रे व्‍हायला हवीत. यापूर्वी मंदिरे केवळ देवतांची आराधना करण्‍याची क्षेत्र होती; पण आता ती धर्मक्षेत्र बनत आहेत. याचे आदर्श उदाहरण, म्‍हणजे प्रयागराज येथे नुकताच झालेला कुंभमेळा होय. कोणत्‍याही निमंत्रणाशिवाय भारतातील जवळपास अर्धी लोकसंख्‍या तेथे आली होती. यावरून हिंदू संघटित होत आहेत, हे स्‍पष्‍ट होते; पण हे संघटन विविध माध्‍यमांतून टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्‍वत: त्‍यांच्‍या कुलदेवीचे उपासक होते आणि त्‍यांनी त्‍यांच्‍या  मावळ्‍यांनाही शिवभक्‍त बनवले होते. त्‍यांनी समर्पित भावाने संघटन केले होते. त्‍याचप्रमाणे  आपल्‍यालाही करायचे आहे. मंदिरासाठी कार्य करत असतांना मंदिर आणि देवता यांचे आपण सेवक आहोत, या भावाने सेवा करायला हवी. ईश्‍वराची सेवा समर्पित भावाने होण्‍यासाठी दैनंदिन प्रार्थना करणे आवश्‍यक आहे. तेव्‍हाच मंदिरातील चैतन्‍य वाढेल आणि तेथे येणारा प्रत्‍येक भक्‍त जातीपातीच्‍या भिंती तोडून केवळ ईश्‍वराचा भक्‍त आणि एक हिंदु म्‍हणून संघटित होईल. तेव्‍हाच खर्‍या अर्थाने रामराज्‍य येईल.




क्षणचित्रे : 


१. मंदिर महासंघाचे प्रेरणास्त्रोत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्‍या संदेशाचे वाचन सनातन संस्‍थेचे श्री. गिरीश कुलकर्णी यांनी केले. 


२. उपस्‍थितांचे स्‍वागत आणि प्रस्‍तावना महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे श्री. प्रशांत देशमुख यांनी केली. आभार प्रदर्शन हिंदु जनजागृती समितीचे अकोला समन्‍वयक  अमोल वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  आनंदी वानखडे आणि हेमंत खत्री यांनी केले.


मंदिर न्‍यास परिषदेत एकमताने संमत झाले ठराव !


१. मंदिरांच्‍या भूमींचे अवैध हस्‍तांतरण थांबवण्‍यासाठी सरकारने ‘अ‍ॅन्‍टी लॅण्‍ड ग्रॅबिंग अ‍ॅक्‍ट’ तात्‍काळ लागू करावा.


२. काशी आणि मथुरा ही तीर्थक्षेत्रे धर्मांधांनी केलेल्‍या अतिक्रमणापासून मुक्‍त करण्‍यासाठीचा खटला द्रुतगती न्‍यायालयाच्‍या माध्‍यमातून निकाली लावावा.


३. हिंदूंची धार्मिक स्‍थाने असलेल्‍या मंदिरांचे व्‍यवस्‍थापन ‘सेक्‍युलर’ सरकार करू शकत नाही, हे न्‍यायालयांनी अनेक वेळा सांगूनही आजपर्यंत महाराष्‍ट्रातील अनेक मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशांचे पालन करत सरकारने राज्‍यातील सर्व मंदिरे सरकारमुक्‍त करून ती भक्‍तांच्‍या स्‍वाधीन करावीत.


४. मंदिरांमध्‍ये भक्‍तांनी श्रद्धेने अर्पण केलेला निधी हा सरकारला दिलेली देणगी किंवा कर नाही. त्‍यामुळे सरकारला मंदिरांतील पैसा विकासकामांसाठी वापरण्‍याचा कुठलाही अधिकार नाही. यासाठी महाराष्‍ट्र सरकारने मंदिरांची संपत्ती विकासकामांसाठी न वापरण्‍याची घोषणा करावी.


५. धर्मादाय आयुक्‍त कार्यालये मंदिरांना विविध कारणांसाठी देणगी देण्‍यासाठी आज्ञापत्रे पाठवत आहेत. अशी नियमबाह्य सरकारी पत्रे महाराष्‍ट्र सरकारने थांबवावी आणि मंदिरांचा निधी केवळ धार्मिक कार्यासाठी उपयोगात आणला जावा, अशी सूचना धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाला करावी.


६. महाराष्‍ट्रातील पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्‍या; परंतु प्रशासन, पुरातत्त्व विभाग यांच्‍याकडून दुर्लक्षित झालेल्‍या मंदिरांचा तात्‍काळ जीर्णोद्धार करण्‍यासाठी सरकारने अर्थसंकल्‍पात भरीव तरतूद करावी.


७. महाराष्‍ट्रातील धार्मिक महत्त्व असलेली तीर्थक्षेत्रे, श्रीक्षेत्रे आणि गडकिल्ले यांवर असलेल्‍या मंदिरांवर झालेल्‍या अतिक्रमणाचे महाराष्‍ट्र सरकारने सर्वेक्षण करून तात्‍काळ ती अतिक्रमणे दूर करावीत. या संदर्भात चालू असलेल्‍या न्‍यायालयीन खटल्‍यांसाठी जलदगती न्‍यायालये निर्माण करावीत.


८. महाराष्‍ट्रातील ‘क’ वर्गवारीतील मंदिरे सर्व कागदपत्रे उपलब्‍ध करूनही ‘ब’ वर्गात वर्गीकृत केली जात नाहीत. याची महाराष्‍ट्र शासनाने दखल घेऊन त्‍या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी.


९. मंदिरांच्‍या परिसरात, तसेच तीर्थक्षेत्रांच्‍या ठिकाणी पावित्र्यरक्षण व्‍हावे, यासाठी मद्य आणि मांस यांची विक्री होणार नाही, याची घोषणा महाराष्‍ट्र सरकारने करावी आणि यासाठी अधिसूचना जारी करावी.


१०. महाराष्‍ट्रातील मंदिरांच्‍या पुजारी वर्गाचे उत्‍पन्‍न नगण्‍य आहे. यामुळे महाराष्‍ट्र सरकारने मंदिरांच्‍या पुजार्‍यांना प्रतिमाह मानधन देण्‍याची व्‍यवस्‍था करावी.


टिप्पण्या