real-need-study-human-faith-: मानवीय श्रद्धेच्या अभ्यासाची खऱ्या अर्थाने गरज - उत्पल व बा यांचे मत

बाबूजी देशमुख वाचनालय व्याख्यानमाला प्रारंभ





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: श्रद्धा ही खऱ्या अर्थाने ईश्वराच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. ईश्वर हा विश्वाचा तारक आहे, तो जग नियंता आहे, त्याने विश्व निर्माण केले आहे. अशा विश्वाच्या उत्पत्ती बद्दल समाजात नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण होतात. ईश्वराला अशा प्रकारे मानणारा वर्ग व ईश्वर या विश्वात अस्तित्वात नाही, असा मानणारा दुसरा वर्ग आहे. पहिला वर्ग हा आस्तिकतेत  मोडल्या जातो व दुसरा वर्ग नास्तिकतेत मोडला जातो. आस्तिक हा वेद प्रामाण्य मानतो तथा नास्तिक एक हा वेद प्रामाण्य नाकारतो. म्हणून आस्तिकते मधून निर्माण झालेली ईश्वरा प्रतीची श्रद्धा याची योग्य तऱ्हेने सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचे मत व्याख्याते उत्पल व बा (पुणे) यांनी व्यक्त केले. 


स्थानीय बाबूजी देशमुख  वाचनालया च्या वतीने नऊ दिवसीय नवरात्र व्याख्यानमाला सोमवार पासून स्थानीय प्रमिलाताई ओक सभागृहात प्रारंभ झाली. यात व्याख्यानाचे प्रथम पुष्प पुणे येथील व्याख्याते उत्पल ब.वा. यांनी "श्रध्दा अंधश्रध्दा आणि विवेक” या विषयावर गुंफले. 


ते म्हणाले, चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य हे ईश्वराचे प्रमाण नाकारतात. जगात ईश्वर नाही, जगाचा निर्माता त्याचे अस्तित्व दिसत नाही अशी भूमिका आहे. दुसरीकडे उत्क्रांती वादाची दिशा ही योग्य असल्याचे हे आढळून येते. जगात ईश्वराचा साक्षात्कार आपणास झाला असे म्हणणारी माणसे अनेक आहेत. माणसाच्या मनातील श्रद्धेचा तो भाग असून ही श्रद्धा खऱ्या अर्थाने अभ्यासली पाहिजे, असे मत व बा यांनी यावेळी व्यक्त केले.


आस्तिक व नास्तिक ते मधील खऱ्या अर्थाने वर्गीकरण करण्याची गरज आहे. तथापि देव नसल्याचे अनेक तर्कशुद्ध विचार समाजात प्रचलित असून त्यांना फेटाळता येऊ शकत नाही. श्रद्धा व धर्म यांची सांगड झाल्यावर त्याचे पर्याय विचारात होत असतात. ईश्वराने जग निर्माण केले याला पुराव्याची गरजही नसल्याचे अनेक महाभाग म्हणत असतात असे ते म्हणाले. तथापि ईश्वराचे अस्तित्व हे वास्तविकतेपेक्षा रंजनामध्ये जास्त दाखविले जात असल्याचे व्याख्याते व बा यांनी यावेळी स्पष्ट केले.


माणसाच्या मनात ईश्वराची कल्पना ही रंजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साकार झाली आहे. कारण माणूस हा उत्सव प्रिय आहे. म्हणून श्रद्धा व अंधश्रद्धेचा विचार एका चाकोरीत करता येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


श्रद्धा व अंधश्रद्धेच्या संदर्भात काही बाबतीत स्पष्ट भूमिका घ्यावीच लागणार. राज्य घटना व राज्याची जी शिकवण आहे, त्या शिकवणीला कोणतेही गालबोट लागता कामा नये. मानवी उत्क्रांतीची पुस्तके ही प्रत्येकाने वाचून त्यातूनच योग्य पद्धतीने निर्णय घेणे शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


सर्वप्रथम बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, सचिव अनुराग मिश्र यांच्या उपस्थितीत व्याख्याते उत्पल व बा यांचे स्वागत करण्यात आले. वक्ता परिचय जेष्ठ कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी दिला. आभार सचिव अनुराग मिश्र यांनी मानलेत.


व्याख्यानात आज मंगळवार दि.15 ऑक्टोबर रोजी एल. के. कुलकर्णी, नांदेड हे "विश्वाची उत्पत्ती या विषयावर बोलणार आहेत. बुधवार दि.16 ऑक्टोबर रोजी डॉ.नंदू मुलमुले, नांदेड हे "सुखाचा शोध" या विषयावर आपले मत मांडतील. गुरुवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सांगोला येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर बडंगर हे "वारकरी संप्रदाय" यावर तर शुक्रवार दि 18 ऑक्टोबर रोजी डॉ

‌बालाजी चिराडे, नांदेड हे "भारतीय स्वातंत्र्य लढयातील दिशा" या विषयावर आपले मत मांडतील.  शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी "मानवी वर्तन आणि मेंदूचा विकास" या विषयावर पुणे येथील अंजली चिपलकट्टी यावर व्याख्यान देणार आहेत.रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी निरंजन आवटे, पुणे हे "संविधान आपले आय-कार्ड" हा विषय घेवून श्रोत्यांशी संवाद साधतील. सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी डॉ. गीताली वि. मंदाकिनी, पुणे या "कोंडीत सापडलेले पुरुष" या विषयावर बोलणार असून व्याख्यानाचे अंतिम पुष्प दि 22 ऑक्टोबर रोजी बेळगांवचे  दिलीप कामत हे "विकास नको, विनाश आवर" या विषयावर बोलुन व्याख्यानाचा समारोप करतील.


या व्याख्यानमालेस  महानगरातील व्याख्यान प्रेमी श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, सचिव अनुराग मिश्र समवेत सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले.

टिप्पण्या