agriculture-university-pdkv-akl: कृषी विकासासाठी पाणी फाउंडेशन अन् कृषी विद्यापीठचे ऋणानुबंध क्रांतिकारी ठरेल- सिने अभिनेता आमिर खान यांचे मत




ठळक मुद्दे 


तीन दिवसीय शिवार फेरीचा दुसऱ्या दिवशी पानी फाउंडेशनच्या गटांनी विद्यापीठ फुलले


शिवार फेरीसाठी कृषी विद्यापीठात उसळला जनसागर! दुसऱ्या दिवशी तब्बल 40  हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू भगिनींनी जाणून घेतले आधुनिक कृषि तंत्रज्ञान!





भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: कोविड महामारीच्या काळात सामाजिक निर्बंध असताना सोयाबीन शेतीशाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम सुरू केले. आज शिवार फेरीच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनची नाळ विद्यापीठाशी जोडली गेली . त्यामुळे भविष्यात येथील शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हा ऋणानुबंध क्रांतिकारी ठरणार असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेता तथा पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी केले. 


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शुक्रवार 20, शनिवार 21 व रविवार 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचे आजचे दुसरे दिवशी अवघ्या विदर्भातून गडचिरोली पासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  





सखोल ज्ञानार्जनाने कृषी क्षेत्रामध्ये प्रगती साधता येणे शक्य आहे असे नमूद करून विद्यापीठातील प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यापीठाने शेतकऱ्यांकरिता निर्मित केलेल्या विविध तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसार होण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन एक स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रयत्नात पाणी फाउंडेशन भरघोस योगदान देणार असल्याचे प्रतिपादित करून त्यांनी उपस्थित पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.




तत्पूर्वी आज सकाळी नऊ वाजताच आमिर खान यांनी शिवार फेरीसाठी नोंदणी करून प्रत्यक्ष प्रत्येक विभागाला भेट देत विद्यापीठाचे तंत्रज्ञान अगदी बारकाईने जाणून घेतले व शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शाश्वत ग्रामोद्धाराचा वसा आपल्या सोबत नेला. 



याप्रसंगी अकोला  विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, आ अमित झनक, विठ्ठल सरप पाटील, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉक्टर अविनाश पोळ, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ अभियंता सतीश देशमुख, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती. 


कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला माल्यर्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या विशेष वार्तालाप सोहळ्याचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी केले. 



यावेळी अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी या शिवार फेरीला उपस्थिती दर्शविल्याबद्दल पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अमीर खान यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. शिवार फेरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेले नवीन संशोधन शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी बघायला मिळण्याची सोय झाल्याचे नमूद करून विद्यापीठ स्थापनेपासून शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यात विद्यापीठाने भरीव कामगिरी केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी दिल्ली येथे भारतातील पहिले कृषी प्रदर्शन भरविल्याची आठवण करीत आपण आजही हा वारसा त्यांच्या नावाने स्थापित केलेल्या या विद्यापीठात जोपासत आहोत, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या या कृषी तंत्र प्रसार कार्यात जे कोणी भागीदार होऊ इच्छितात त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो असे सांगून त्यांनी पाणी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. एक अभिनेता कृषी विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करीत असल्याचे बघून आनंद वाटतो अशा शब्दात त्यांनी आमिर खान यांच्या कार्याचा गौरव केला. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकीकृत शेती पद्धती मॉडेलची गरज अधोरेखित करून त्यांनी याविषयी सर्व दूर प्रचार प्रचाराची गरज असल्याचे नमूद केले. शेती व्यवसायातील श्रमाला प्रतिष्ठा मिळावी तसेच कृषी पदवीधरांमध्ये रोजगार निर्मिती विषयी उत्तेजना मिळण्याच्या दृष्टीने याविषयी एखादा चित्रपट निर्माण करावा अशी त्यांनी आमिर खान यांना विनंती केली.




यावेळी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी विद्यापीठाच्या शिवार फेरी आयोजन एक स्तुत्य उपक्रम असल्याचे नमूद करून शेतकरी हितांच्या शासकीय योजनांची अतिशय उपयुक्त माहिती दिली. पाणी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना मिटकरी यांनी अशा उपक्रमांची गरज देखील अधोरेखित केली.  


आमदार अमित झनक यांनी विद्यापीठाच्या प्रगत तंत्रज्ञानाची व शेतकरी हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विस्तार कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अकोला कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन तथा विस्तार कार्यात अग्रेसर असून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची यशस्वी घोडदौड प्रतिपादित करत शेतकरी आणि विद्यापीठाच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य तत्पर असल्याचे आपले मनोगत सांगितले. 




यावेळी शिवार फेरी सभा मंडपात शेतकरी बंधू -भगिनी, युवक -युवती सह पाणी फाउंडेशनच्या संपूर्ण विदर्भातून आलेल्या विविध बचत गट सदस्यांची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.



सोयाबीन आणि कापसाला भाव द्या


आमदार अमोल मिटकरी यांचे भाषण सुरू असताना अमरावती जिल्हयातील आंबोडा गावातील शेतकऱ्यांनी, पहिले सोयाबीन आणि कापसाला भाव द्या, अशी ओरडून मागणी केली. भाषण संपल्यानंतर आमदार मिटकरी यांनी व्यासपीठ वरून खाली येऊन या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. यावेळी शेतकरी गौरव पाटील आणि इतर शेतकरी यांनी आपल्या समस्या सांगितल्या.




दरम्यान, आज सकाळी 9 वाजेपासूनच विद्यापीठाचे शेतकरी सदन येथे शेतकरी बांधवांनी नोंदणीस सुरुवात करीत नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे नियोजित 24 संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेतले व उपस्थित शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले. 




यंदा देखील अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवाय फेरीचे नियोजन करण्यात आले असून गहू संशोधन विभागाचे 20 एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 210 विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती आदींचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे तंत्रज्ञान शिफारशीचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. या प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवांची अभूतपूर्व गर्दी उसळलेली होती.



उद्यान विद्या विभाग सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कापूस संशोधन विभाग लिंबूवर्गीय फळे संशोधन विभाग सोयाबीन प्रक्षेत्र ज्वारी संशोधन विभाग धान्य संशोधन विभाग तेलबिया संशोधन विभाग कोरडवाहू संशोधन विभाग यासह पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आणि नागार्जुन वनौषधी उद्यानाला शेतकरी बंधू भगिनींची गर्दी झालेली पाहून विद्यापीठातील सर्वांचाच उत्साह द्विगुणीत झाला होता. 





चर्चासत्र कार्यक्रम दरम्यान शेतकऱ्यांनी तेलबिया, कडधान्य, औषधी व सुगंधी वनस्पती रोगशास्त्र तसेच कृषी अभियांत्रिकी विषयक प्रश्न विचारले. यावेळी विद्यापीठातील संबंधित विषयाच्या शास्त्रज्ञांनी त्यांची समर्पक उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे शंका समाधान केले.


उद्या समारोप 


उद्या 22 सप्टेंबर रोजी शिवार फेरीचा समारोप होणार असून, महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांचेसह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी शिवार फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केली आहे.




टिप्पण्या