political-news-sanjay-raut-akl: कुबड्यांवरचं सरकार कधीही कोसळू शकतं - संजय राऊत यांचे विधान; अकोल्यात संजय राऊत यांची पत्रकार परिषद






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा पक्ष संघटनात्मक आढावा बुधवारी सकाळी अकोला शहरातील एका हॉटेल मध्ये घेतला. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत मोदी-शहा, शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपवर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढविला.


आमदार नितीन देशमुख यांना देखील त्रास

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अत्यंत घातक पायंडा घातला आहे. विरोधक हे राजकीय वैचारिक शत्रू नसून ते दुश्मन आहेत, असा समज करून त्यांच्यावर हल्ले, गुन्हे, आणि खटले चालवले जात आहेत. स्थानिक आमदार नितीन देशमुख यांना देखील त्रास देण्यात येतो. त्यांनी पक्षाशी बेइमानी केली नाही. ते खोक्यानी विकले गेले नाहीत, म्हणुन त्यांना शेवटी चार्टर विमानाने वापस पाठविण्यात आले होते, या प्रसंगाची आठवण संजय राऊत यांनी यावेळी काढली. निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसा त्यांना त्रास दिला जात आहे,असे सुध्दा राऊत म्हणाले.



मोदी आणि शाह महाराष्ट्राचे खरतर भाऊच नाहीत


मोदी आणि शाह महाराष्ट्राचे सावत्र भाऊ काय, खरतर भाऊच नाहीत. मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेवढे महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढे नुकसान आज पर्यंत कोणी केलेले नाही, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी लाडक्या बहिण योजनेवरही जोरदार टीका केली.




दिल्लीचे पोपट म्हणून ते बोलत आहे

एकनाथ शिंदे सारखा लोचट मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. राज्याच्या नव्हेतर देशाच्या  इतिहासात आजपर्यंत असा लोचट मुख्यमंत्री कुणी पाहिला नाही. दिल्लीचे पोपट म्हणून ते बोलत आहे. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही, अशी बोचरी टिका संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली.महाराष्ट्राला बदल हवाय, आणि हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही कंबर कसली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट सांगितले.


कुबड्यांवरचं सरकार

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच बहुमत आलेलं नाही, हे आमचं सगळ्यात मोठं यश आहे. दोन्ही निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. त्यांचं सरकार तीनशेच्या पार जाऊन स्वतःच्या ताकदीवर आलं होतं. भाजपला यावेळी बहुमत मिळालेलं नाही, हे सरकार कुबड्यांवरचं सरकार आहे. तसेच हे कुबड्यांवरचं सरकार कधीही कोसळू शकतं, असे राऊत म्हणाले.


प्रचारात चर्चा होईलच

कोणत्याही परिस्थितीत बदल होईल अशी राज्यात आज परिस्थिती आहे. सरकारी तिजोरीतून पैश्यांची किती उधळपट्टी केली, लाडक्या बहिणीला पैसे मिळालेच पाहिजेत. पण पंधराशे रुपयांचा जो आकडा आहे, त्यात आमचं सरकार आल्यावर भरघोस वाढ होईल. लोकसभा निवडणूक हरल्यावर लाडक्या बहिणीची आठवण आली. तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार यांच्या पलीकडे यांचं लाडकं कोणी नव्हतं. एका एका आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात आले, खासदारांना 100 कोटी रुपये देण्यात आले. आताही शिवसेनेच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांना फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. पण लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये. यावर प्रचारात चर्चा होईलच असे देखील राऊत म्हणाले.



 


आंबेडकरांचे खरे वारसदार

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावर राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकर हे आंबेडकर आहेत. या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत, प्रकाश आंबेडकरांना त्याचं भान असतं तर त्यांनी अशा प्रकारची विधानं केली नसती. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई. हे आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत असे जर आम्ही म्हणालो तर त्यात चुकीचे काहीच नाहृी. गेली अनेक वर्ष रामदास आठवले आंबेडकरांचा विचार जिद्दीने पुढे नेत आहेत. अनेक वर्ष सत्तेत आहेत. डॉ. बाबासाहेब ज्या पद्धतीने देशात काम करायचे त्याच पद्धतीने आठवले करत आहेत. याचा अर्थ आम्ही असा म्हणायचा की आंबेडकरांची जी विचारधारा, संघटना होती त्याचे खरे वारसदार आठवले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर अनंत उपकार केले आहेत. प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न करत होते, ते महाविकास आघाडीचे घटक होते, लोकसभेत त्यांना आम्ही सात जागा देऊ केल्या होत्या. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले तो काही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भुमिका नाही. आपल्या कृतीमुळे राष्ट्रद्रोही आणि धर्मांध शक्तींना मदत होत असेल तर ते कुणीही असतील. महाराष्ट्रात असे दोन व्यक्ती आहेत ते हस्तकांचं काम करतात. कधी मोदी शहांना पाठिंबा देतात, कधी बेईमना शिंदे गटाला पाठिंबा देतात. हे दोन नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्यावर महाराष्ट्राने विचार करण्याची वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणे आणि व्यवहार करणे हे या नेत्यांचं काम आहे. खरं तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रद्रोही, धर्मांध शक्तींना धडा शिकवायला पाहिजे. पण तसे न करता या लोकांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपले उमेदवार उभे केले पाहिजे म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात, देशात त्यांनी निवडणुका लढवाव्यात आणि मोठा व्यवहार करावा. हे नेते कोण आहेत ते राज्याच्या जनतेला माहिती आहे.



बोगस डिग्र्या छापल्या जातं आहेत 


या देशात पंतप्रधानांपासून भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या बोगस आहेत. महाराष्ट्रात बोगस डिग्र्या छापल्या जात आहेत. पंतप्रधानांच्या डिग्रीचाच जिथे वाद आहे, तिथे हा विषय फार गंभीर आहे.






टिप्पण्या