narendra-dabholkar-murder-case: 'भगव्या आतंकवादा'ला स्थापित करण्याचे षड्यंत्र विफल ; दाभोळकर हत्याकांड निकालानंतर HJS ची पुणे - मुंबई येथे पत्रकार परिषद




ठळक मुद्दा 

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध; साधक निर्दाेष मुक्त



भारतीय अलंकार न्यूज 24

पुणे/मुंबई : आज डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेषच होते, हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे ‘ अर्बन नक्षलवाद्यां ’चे षड्यंत्र विफल झाले आहे. आज पुणे सी.बी.आय. विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे आणि हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. विरेंद्रसिंह तावडे यांना निर्दाेष मुक्त केले, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे ॲड. संजीव पुनाळेकर यांनाही निर्दाेष मुक्त केले आणि हे करतांना या गुन्ह्यात लावलेला दहशतवादी कारवायांशी संबंधित UAPA कायदाही रद्द ठरवला आहे. हा UAPA कायदा लावून सनातन संस्थेला भगवे आतंकवादी ठरवून बंदी घालण्याचा डाव होता, तो या निकालाने ध्वस्त झाला आहे, असे वक्तव्य हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य प्रवक्ते सुनील घनवट यांनी केले.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल पुणे विशेष न्यायलयाने आज जाहीर केला. यानंतर पुणे आणि मुंबई येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी घनवट बोलत होते.



या प्रकरणात दोषी ठरवलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा प्रत्यक्ष जरी सनातन संस्थेशी संबंध नसला, तसेच ते सनातन संस्थेचे पदाधिकारी नसले, तरी त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले, अशी आम्हाला शक्यता वाटते. त्यामुळे या प्रकरणातील अधिवक्त्यांनी जशी इतरांना निर्दाेष मुक्त करण्यात भूमिका बजावली, तशीच उच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन त्यांनाही निर्दाेष मुक्त करण्यासाठी लढतील, असे त्यांनी आज घोषीत केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे निर्दाेष मुक्त होतील, अशी आम्हाला खात्री वाटते.


या प्रकरणी आरोपपत्रात वेगवेगळ्या आणि सतत बदलणार्‍या भूमिका तपास यंत्रणांनी मांडल्या. इतकेच नव्हे, तर आरोपी शोधण्यासाठी ‘प्लांचेट’च्या माध्यमातून सनातन संस्थाच दोषी असल्याचे वदवून घेण्यात आले. त्यानंतर सनातन संस्थेचे विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना अगोदर मारेकरी ठरवण्यात आले. त्यापूर्वी ज्यांच्याकडून पिस्तुल मिळाले, त्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनाही क्लिन चिट देण्यात आली. त्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी हत्या केल्याची भूमिका मांडण्यात आली. या प्रकरणातील साक्षीदारांची भूमिकाच संशयास्पद होती. त्यांनी अगोदर विनय पवार आणि अकोलकर यांनाही मारेकरी म्हणून ओळखले होते. न्यायालयात त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते येऊन भेटल्याचे तसेच ते त्यांच्यासोबत जेवत असल्याचेही न्यायालयात त्यांनी सांगितले होते. साक्षीदारांच्या या कृतीतून त्यांच्यावर अंनिसचा दबाव होता का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


पुणे येथील सनातन संस्थेची पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि सनातन संस्थेचे पुणे येथील चैतन्य तागडे उपास्थित होते.




पूर्वग्रहदूषितपणे तपास- चेतन राजहंस 




या प्रकरणात अंनिसचे केवळ साक्षीदारांशी संबंध असल्याचेच सिद्ध झाले इतकेच नव्हे, तर डॉ. दाभोलकरांच्या परिवाराने तपास यंत्रणांवरही दबाव आणला. परिणामी सनातन संस्थेचा पूर्वग्रहदूषितपणे तपास करण्यात आला, असा आरोप मुंबई येथील पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ता चेतन राजहंस यांनी केला. 


गेल्या 11 वर्षांत सनातनच्या 1600 साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. सनातनच्या आश्रमांवर धाडी घालण्यात आल्या. या प्रकरणात मास्टरमाईंड शोधण्याच्या नावाखाली खटला प्रलंबित ठेवण्यात आला. सीबीआयने आरोपपत्रात सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांची चौकशी करून त्यात कोणीही दोषी आढळले नाही, असे नमूद केले आहे. आज 11 वर्षांनंतर सनातन संस्थेला विलंबाने मिळालेला हा न्याय आहे, असे देखील चेतन राजहंस यावेळी म्हणाले.


मुंबई येथील सनातन संस्थेची पत्रकार परिषदेला वक्ते अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते  सतीश कोचरेकर उपास्थित होते.



टिप्पण्या