shiva-parvati-marriage-in-rail : पारंपारिक शिव पार्वती विवाह रेल गावात संपन्न; निवडणुक उमेदवारांनी लावली हजेरी





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : वऱ्हाडी मंडळीची लगबग. नवऱ्या मुलाच्या मित्रांचा लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्याचा जोश. वाजंत्री, सनई चौघडा. मान पान…कोणत्याही लग्नातील असंच काहीसं चित्र असतं. याही लग्नात सर्व काही असंच होतं. मात्र तरीही हे लग्न विषेश महत्त्वाचं. कारण हे लग्न लागल देवाधीदेव महादेव आणि माता पार्वतीचं. भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या विवाह सोहळ्याची ही परंपरा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रेल या गावाने हजारों वर्षांपासून जोपासली आहे.





गावातील महादेव कोळी हा आदिवासी समाज ही परंपरा आपल्या पुढल्या पिढी कडे सोपवित आहेत. चैत्र महिन्यातील शुद्ध अष्टमी या शुभ दिवशी गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा उत्सव परंपरेने साजरा केला जातो. 





रेल हे गाव अकोला अकोट रोडवर करोडी फाट्यावरुन पूर्वेस 5 कि.मी. अंतरावर आहे. शिव पार्वती विवाह सोहळ्यामुळे हे गाव प्रसिद्धीस आले आहे. या विवाह सोहळ्यास लाखों भाविक दरवर्षी हजर राहतात. याच संधीचे सोने करीत यंदा लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मधील अकोला मतदार संघाचे उमेदवार यांनी सुध्दा या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. 



महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे हे या सोहळ्यास आवर्जून हजर राहिले. विकासात्मक कामांना अधिक गती मिळावी, असे यावेळी अनुप धोत्रे यांनी देवाकडे साकडं घातले. यावेळी आमदार रणजित सावरकर त्यांच्या सोबत होते.




तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या धर्मपत्नी डॉ. रेखा पाटील यांनी देखील या लग्नात उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या आणि महिला वर्गाशी संवाद साधला. 



चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध अष्टमी तिथीला रेल गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातो. अगदी खऱ्या-खुऱ्या लग्नासारखाच या विवाहातील विधी केला जातो. दरवर्षी गावातील दोन कुटुंबांना नवरा आणि नवरी मुलीच्या आई- वडिलांचा नव्याने मान दिला जातो. मात्र गावातील घुगरे कुटूंबियांकडे वर पक्षाचा तर इंगळे परिवाराकडे वधु पक्षाचा परंपरेने कायम मान असतो.  लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या वऱ्हाडी मंडळींची सरबराई करण्यात गावातील प्रत्येकजण गुंतलेला दिसतो. 




हा लग्न सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री रेलेश्वर महादेव संस्थानचे अध्यक्ष सुधाकर घुगरे आणि समस्त विश्वस्त मंडळ आणि गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.







टिप्पण्या