political-maharashtra-rpi-akola: तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचा होणार - ना. रामदास आठवले





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) आणि मी एकत्र आलो तर महाराष्ट्राचे चित्र बदलवू. चांगली ताकद उभी केली तर एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचा झाल्या शिवाय राहणार नाही,असे वक्तव्य रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय सामजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.






जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे अकोला जिल्ह्यतील गायरान जमीन अतिक्रमण धारकांकरिता हक्क परिषद आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.




बहुजन, अल्पसंख्यांक, मराठा यांनी एकत्र आले पाहिजे. सर्व समाजाला एकत्र आणण्याची बाळासाहेबांची ही भूमिका चांगली आहे,असे देखील आठवले म्हणाले. आपल्या जाहीर भाषणातून आठवले यांनी यावेळी पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याची हाक दिली.


संविधान हे बदलणार नाही. सूर्याला हात लावणे हे सोपे नसते. तसे संविधानाला हात लावणे सोपे नाही,असे देखील आठवले म्हणाले.


आठवले यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना मार्गदर्शन करताना आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं. मात्र या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवली. 


गायरान जमीन अतिक्रमण धारकांच्या सोबत- सुनील अवचार 


अकोला जिल्ह्यातील तमाम गायरान जमिन अतिक्रमण धारकांना त्यांचे नावे कायमस्वरुपी सात-बारा मिळवून देण्यासाठी, तसेच सरकारी जमीनीवर रहिवासी असलेल्या बेघर गरीबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा दिला जात आहे. न्यायालयात आपल्या बाजूनंच निकाल लागणार ,असा विश्वास आहे.  मात्र जर कुणी अतिक्रमणं धारकांना त्रास देत असतील तर जीवाची पर्वा न करता अतिक्रमण धारकांच्या सोबत उभे राहू. त्यांना न्यायहक्क  मिळवून देण्यास आम्ही कटिबध्द आहो, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून अवचार बोलत होते.








कार्यक्रमाला रिपब्लीकन झोपडपट्टी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुमित वाजळे, जिल्ह्याचे महासचिव जे पी सावंग, स्वागताध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण, आकाश हिवराळे आदी उपस्थित होते. 



प्रारंभी गायिका भाग्यश्री इंगळे यांनी भिमगीत गायिले. कार्यक्रमाचे संचालन आकाश हिवराळे यांनी केले.






अकोला येथे आयोजित या गायरान अतिक्रमण हक्क परिषदेला जिल्ह्यातील गायरान अतिक्रमण धारक व बेघर गरीब मोठ्या संख्येने उपास्थित होते.






टिप्पण्या