winter-session-2023-nagpur: सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे; देवेंद्र फडणवीस यांनी लिहले अजित पवार यांना पत्र, काय आहे यामागील कारण?





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या वरुन वादळी वातावरण निर्माण झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अजित पवारांना पाठिंबा देत सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. यावरुन सभागृहात जोरदार टीका झाली.



मलिक यांच्या निर्णयानंतर या मुद्द्यावर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुद्दावरुन अधिक राजकिय वातावरण गडद होवू नये यासाठी फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या सत्तेतील सहभागाला विरोध करीत असल्याचे पत्र अजित पवार यांना लिहले आहे. हे पत्र समाज माध्यामांवर देखील फडणवीस यांनी पोस्ट केले. यानंतर हे पत्र वेगाने पसरले.



राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. तशी भिती पत्रात फडणवीस यांनी व्यक्त केली. अधिवेशनामध्ये झालेल्या टिकेनंतर भाजप नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशाला विरोध केला असून तसे पत्र त्यांनी अजित पवार यांचे नावे लिहले आहे. सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे ,असे म्हणत त्यांनी मलिकांना महायुतीत घेणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.


असे आहे पत्र 


माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे." असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे. असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.


टिप्पण्या