Political news: प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस सोबत येण्यासाठी हात जोडून विनंती करु - वसंत पुरके




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे 

अकोला : इंडिया मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला जागा मिळणार की नाही, यासंदर्भात येणाऱ्या 19 डिसेंबरला होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. एकीकडे वंचित बहुजन आघाडी सतात्याने इंडिया मध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत असून दुसरीकडे काँग्रेसही वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही दिसून येत आहे. देशात लोकशाही टिकवायची असेल, वाचवायची असेल आणि आणखी मजबुत करायची तर आंबेडकर यांनी यात आले पाहिजे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आम्ही काँग्रेस सोबत येण्यासाठी हात जोडून विनंती करू, असे विधान भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी केले. ते सोमवारी अकोला येथे आले असता, स्वराज भवन येथे निमंत्रित पत्रकार परिषदेत बोलत होते.


येत्या 28 डिसेंबरला भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचा 138 वा स्थापना दिन साजरा होणार आहे. या अनुषंगाने सोमवारी स्वराज्य भवन येथे वसंतराव पुरके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानिमित्त पुरके अकोला शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.




माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे अनेक लोक प्रकाश आंबेडकर यांना भेटून गेले असल्याचं ही ते म्हणाले. तर आंबेडकर यांनी सोबत यावं  त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस हाय कमांड त्यांना पद देण्यासाठी तयार असल्याचेही पुरके यांनी सांगितले.




काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त  27 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या एकजूट आणि संघटनेसाठी  नागपूर येथे महाअधिवेशन भरविण्यात येणार आहे. अधिवेशनाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे  मार्गदर्शन करतील. अधिवेशनात काँग्रेसची आगामी निवडणुकीची भूमिका ध्येय धोरण आखण्यात येतील. अधिवेशनाला देशभरातून जवळपास दहा लाख नागरिक उपस्थिती राहणार आहे, असा अंदाज पुरके यांनी व्यक्त केला. 

आजपर्यंत काँग्रेसची विचारधारा ही देशाची जागतिक पातळीवर कल्याण व्हावे हीच आहे. अधिवेशनात ‘लोकशाही जगली पाहिजे’ तसेच ‘न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता जगली पाहिजे’, या मुद्द्यावर जोर देण्यात येणार आहे आणि याच मुद्द्यांवर विचार मंथन केले जाईल,अशी माहिती पुरके यांनी दिली.





पत्रकार परिषदेला काँगेसचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते श्याम उमाळकर, विठ्ठल अंभोरे ,ॲड. नतिकुद्दीन खतीब, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, अशोक अमानकर, प्रकाश तायडे, मदन भरगड, साजिद खान पठाण, प्रदीप वाखारिया महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, चंद्रकांत सावजी, पुजा काळे, तश्वर पटेल, महेंद्र गवई, आकाश कवडे, पराग कांबळे, ॲड. विजय झटाले पाटिल आदी उपस्थित होते. 




टिप्पण्या