campaign-against-hatespeech: सनातन धर्म विषयी 'हेटस्पीच' करणाऱ्यां विरोधात 'मी सनातन धर्मरक्षक' अभियान; राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांची माहिती




ठळक मुद्दा 

सनातन धर्माला संपवण्याविषयी 'हेट स्पीच' करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही ? श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था सनातन धर्माच्या रक्षणासाठी 'मी सनातन धर्मरक्षक' अभियान राबवणार !



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच. आय. व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रात निखिल वागळे यांच्यासारखे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड ही सनातन धर्म संपवण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून 'सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, अशा प्रकारची विषारी टीका करत आहेत. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने 28 एप्रिल 2023 यादिवशी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, जर कोणी 'हेटस्पीच' करून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्वतःच दखल घेऊन प्राथमिक तक्रार (FIR) दाखल केली पाहिजे. यात सरकारने विलंब केल्यास त्याला मा. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानले जाईल. इतका स्पष्ट आदेश असतांनाही या 100 कोटी समाज असणाऱ्या सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल का झालेला नाही ? त्यामुळेच सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी 'हेटस्पीच' करणाऱ्यांच्या विरोधात मी सनातन धर्मरक्षक' हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सनातन धर्मियांत जागृती करणारी व्याख्याने बैठका घेणे, तसेच 'हेटस्पीच' करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणे, अशा प्रकारच्या कृती केल्या जाणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी अकोला येथील हॉटेल सेंटर प्लाझा येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.


सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट यासाठी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वप्रथम जे.एन.यु. मध्ये 'भारत तेरे टुकडे होंगे' च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व' नावाने हिंदुत्व संपवण्यासाठी परिषदा घेतल्या गेल्या. त्या वेळी विरोध झाल्यावर 'आम्ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही, तर राजकीय हिंदुत्वाच्या विरोधात आहोत' असा खुलासा केला गेला; मात्र आता तर 'सनातन धर्म' संपवण्याचीच भाषा केली जात आहे. ओवैसीच्या 100 कोटी हिंदूंना संपवण्याच्या भाषेपेक्षा हे वेगळे काय आहे? 'हेटस्पीच' च्या खटल्यात, सर्वाेच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी 30 गुन्हे नोंदवल्याचे सांगितले आहे. त्यातील बहुतांश गुन्हे सकल हिंदु समाजाच्या 'हिंदु जनआक्रोश मोर्च्या' तील हिंदुत्ववादी वक्त्यांच्या विरोधात दाख गेले आहेत. हे गुन्हे दाखल करण्याच्या मागे अर्बन नक्षलवाद्यांशी जोडलेल्या वामपंथी विचारसरणीच्या तिस्ता सेटलवाड यांच्या 'सिटीझन फॉर जस्टिस अॅण्ड पीस' या संघटनेचा हात आहे; मात्र याच संघटनेने स्टॅलिन, प्रियांक खर्गे, निखिल वागळे, आव्हाड इत्यादींच्या विरोधात 'हेटस्पीच' चा एकही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे एकूणच सनातन धर्म संपवण्याचे हे डाव्या विचारसरणीच्या अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे षडयंत्र करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासह त्यांची 'एन.आय.ए.' कडून चौकशी करण्यात यावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी असल्याचे राजहंस यांनी सांगितले.


या अर्बन नक्षलवाद्यांचे हे सनातन धर्माच्या विरोधातील षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी मी सनातन धर्मरक्षक' हे अभियान समितीच्या वतीने सर्वत्र राबवण्यात येणार असून यामध्ये सनातन धर्माचे महत्त्व सांगणारी व्याख्याने घेतली जाणार आहेत, असेही  राजहंस यांनी सांगितले.


पत्रकार परिषदेला शिवसेना (शिंदे गट) महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, राष्ट्र जागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष संजय ठाकूर, हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, हिंदू जनजागृती समितीचे अकोला जिल्हा समन्वयक अमोल वानखडे यांच्यासह ॲड. श्रुति भट, ॲड. मुकुंद जालनेकर, उदय महा, माजी नगरसेवक शशी चोपडे, गजानन नागपुरे, पल्लवी वानखडे आदी उपस्थित होते.



आज जाहीर व्याख्यान

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता  चेतन राजहंस यांचे 'सनातन हिंदू धर्म नष्ट करण्याच्या षडयंत्रामागे कोण ???' याविषयावर मंगळवार १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता 

आर्य समाज मंदिर, डी.ए. व्ही. कॉन्व्हेंट गांधी रोड अकोला येथे जाहीर व्याख्यानचे आयोजन केले आहे. व्याख्यानाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.





टिप्पण्या