ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: हर घर सावरकर अभियान अंतर्गत शिवसेना-भाजप युतीच्या वतीने रविवारी प्रमिलाताई ओक सभागृहात घेण्यात आलेल्या 'सागरा प्राण तळमळला' या नाटकाच्या प्रयोगास अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज्वाजल्य देशभक्ती मांडण्यात आली.
प्रारंभी नाटय मंचावर मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. त्यानंतर छत्रपति श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हारअर्पण व दीप प्रज्वलन करुन नाटकास सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, माजी महापौर विजय अग्रवाल, संदीप पाटील, विट्ठल सरप, योगेश अग्रवाल, आश्विन नवले, ॲड पप्पू मोरवाल, भाजप नेते जयंत मसने यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक शशी चोपडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभुषा करुन सर्व रसिकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन योगेश अग्रवाल यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी हर घर सावरकर अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत हिंदू तेज सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सागरा प्राण तळमळला या नाटकाचे प्रयोग पूर्ण राज्यात होत असून, अकोला शहरात हा प्रयोग रविवारी नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आला होता.
श्री बालाजी निर्मित व मधुसूदन कालेलकर लिखित सागरा प्राण तळमळला या नाटकात स्वातंत्र्य वीर सावरकरांचे हिंदुत्व व त्यांनी देशासाठी केलेला त्याग व केलेले महान कार्याचा इतिहास नागरिकांपुढे जीवंत करण्यात आला. सावरकरांचे अखंड हिंदुस्तानचे स्वप्न, स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी केलेला त्याग, कुटुंबापेक्षा राष्ट्राला समर्पित होऊन सहन केलेल्या हाल-अपेष्टा, ब्रिटिशांच्या मनात सावरकरांच्या देशभक्तीची भरलेली धडकी आदी क्षणांनी भरलेले व अक्षरश: अंगावर शहारे आणणारे नाटकाच्या सादरीकरण झाले. प्रेक्षकांनी नाटकातील स्फूर्ती देणाऱ्या विविध क्षणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत प्रेक्षकांनी नाटय प्रयोग अक्षरशः डोक्यावर घेतला. स्वातंत्रवीर सावरकर यांचा जयघोष करीत रसिकांनी नाट्यगृह दणाणून सोडले. वंदे मातरम् आणि जय भवानी जय शिवाजी घोषणा देत रसिकांनी नाटकाला कलाकारांना मनमुराद दाद दिली. नाटय प्रयोगाला तरुणाईची लक्षणीय उपस्थिति होती. सभागृह आणि गॅलरी भरगच्च भरली होती. शेकडो रसिकांनी उभे राहूनच नाटक बघितले. नाटक पाहण्यासाठी शहरातील गणमान्य नागरिकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश गीते, प्रवीण वैष्णव, नितीन मानकर, निखिल ठाकूर, सौरभ नागोसे, महेश मोरे, सागर पूरर्ण, गणेश गोगे, नागेश इंगोले, अजय बोदडे, दीपक नावकार, सुनील उगले, स्वानंदी पांडे, निशा गॅरल आदींनी परिश्रम घेतले असून कार्यक्रमाचे संचालन महानगरप्रमुख योगेश अग्रवाल यांनी केले शहरातील नाटय प्रेमी तसेच शिवसेना-भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडद्यामागचे कलाकार
या दोन अंकी नाटकाचे लेखन मधुसुदन कालेलकर, दिग्दर्शन - कुमार सोहोनी, नेपथ्य -संदेश बेंद्रे, नेपथ्य निर्माण - प्रविण बनसोडे,प्रकाश योजना - कुमार सोहोनी, सहाय्यक गुरु राउळ, पाश्वसंगीत - नंदलाल रेळे, ध्वनिसंयोजन - विलास दाते , ध्वनिमुद्रण- अक्षय डिजीटल साऊंड, करिष्मा आठवले, हार्डकर, रंग भूषा प्रदिप दाणें, सहाय्यक प्रसाद, वेषभूषा पूर्णिमा ओक, कपडेपट - कैलास शिंदे, अनिल वाघचवरे, रंगमंच व्यवथ्या प्रतिक, निर्मिती व्यवस्था नंदू जुवेकर, सुत्रधार महेश मांजरेकर आहेत.
यांनी दिला भूमिकेला न्याय
माई सावरकर यांची भूमिका सुरभी भावे यांनी उत्तम साकारली.
आप्पा- उन्हासकर रोहीत मावळे,
लक्ष्मण-इन्पेकटर - निनाद शेटये, प्रभात ल्यूसी - वरदा साळुंके, येसू वहिनी - संध्या म्हात्रे, बाळ -केदार जोशी
नाना - बाबाराव-आकाश भडसावळे, अधिकारी - ऑफिसर - शार्दूल आपटे,
वॉर्डर - दुर्गेश आरेरकर, युसुफ- नंदू जुवेकर, बॅरी सुनिल गोडसे आणि तात्याराव सावरकर यांची मुख्य भूमिका अंगद म्हसकर यांनी वठविली.
(सर्व छायाचित्र: ॲड. नीलिमा शिंगणे जगड)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा