yuva sahitya sammelan: akola: अकोल्यात भरणार युवा साहित्यिकांची मांदियाळी !!

विदर्भ साहित्य संघाचे आयोजन : राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन



ठळक मुद्दे 

*विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे आयोजन 


*अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप तर उदघाटक ऐश्वर्य पाटेकर  


*अकोल्यात 5 व 6 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन




भारतीय अलंकार 24

अकोला : युवक समाजाचा मानबिंदू असून युवकांच्या साहित्य आणि जीवन विषयक जाणिवा समृद्ध व्हाव्या, या हेतूने विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अकोल्यात होणार असून या संमेलनाचे आयोजन  विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाद्वारे स्व.बाजीराव पाटील साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड येथे  दि. 5 व 6 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.  

      

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या युवा साहित्य संमेलनात युवकांमध्ये साहित्यिक दृष्टी विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, टॉक शो, युवा आयकॉन अशा नानाविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे.       

      

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत तर नाशिक येथील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर  उदघाटक म्हणून लाभले आहेत. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर व  स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहेत. 

    

दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप अरविंद जगताप यांच्या अध्यक्षीय मनोगताने आ. नितीन देशमुख (बाळापूर), आ. अमोल मिटकरी व  डॉ.पं.दे.कृ.वि. कुलगुरु डॉ. शरद गडाख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

       

विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, संमेलन आमंत्रक डॉ. रवींद्र शोभणे,विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोल्याचे अध्यक्ष विजय कौसल, संमेलन सरचिटणीस अशोक ढेरे, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे (रोठे), संमेलन चिटणीस प्रा. डॉ. सुहास उगले आणि सहकार्यवाह डॉ. विनय दांदळे यांच्यासह अकोला शाखा कार्यकारी मंडळातील सदस्य विनायक क्षीरसागर, सुरेश पाचकवडे, विजय देशमुख, मोहिनी मोडक, नीरज आवंडेकर, प्रा. निशा बाहेकर, डॉ. दिलीप इंगोले, डॉ. साधना कुलकर्णी, कल्पना कोलारकर, प्रा. डॉ. गजानन मालोकार, प्रा. डॉ. किरण वाघमारे आणि निलेश पाकदुणे,  ज्येष्ठ कार्यकारिणी मार्गदर्शक सुधाकर गणगणे, प्रा. पंढरीनाथ मांडवगणे, पद्मा मांडवगणे व बाजी वझे यांच्या मार्गदर्शनात या संमेलनच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. 

       

संमेलनाच्या स्वागत समितीमध्ये अकोल्यासह विदर्भातील मान्यवरांचा समावेश आहे. या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास अकोल्यासह राज्यातील युवक तथा साहित्य रसिकांनी भेट देऊन प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजन समिती द्वारे करण्यात आले आहे.                  



राष्ट्रगौरव दिंडीतून होणार युवा साहित्याचा जागर

     

युवा साहित्य संमेलनाची सुरवात राष्ट्रगौरव दिंडीने शनिवार दि. 5 नोव्हे. रोजी सकाळी 9 वाजता होईल. या दिंडी मध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी साहित्य दालन, कवी कट्टा, गझल कट्टा, वर्‍हाडी कट्टा आणि प्रकाशन मंचाचे उद्घाटन आ. वसंत खंडेलवाल यांचे हस्ते होणार आहे.    


      

ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन 

     

राष्ट्रगौरव दिंडीनंतर संमेलनाचे रीतसर उदघाटन युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक  ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते व  संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता होणार आहे.  विभागीय आयुक्त अमरावती आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर व  स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे प्रमुख्याने  उपस्थितीत राहणार आहेत. 



युवकांच्या वाचन अभिवृद्धीचे होणार परिशीलन

   

उदघाटन कार्यक्रमानंतर दुपारी 1 वाजता ऐश्वर्य पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली ’युवा पिढी सध्या काय वाचतेय?’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात संतोष अरसोड (यवतमाळ), नितीन नायगांवकर, नागपूर, चंद्रकांत झटाले, अकोला, अ‍ॅड. कोमल हरणे, अकोला, मैत्री नरेंद्र लांजेवार यांचा सहभाग असणार आहे. 



कविसंमेलनात होणार युवकांच्या काव्यप्रतिभेची अभिव्यक्ती  

   

साहित्य संमेलनांच्या पहिल्या दिवशी दुपारी 4 वाजता सुप्रसिद्ध कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे संमेलन राहणार असून यामध्ये नितीन देशमुख, अमरावती, डॉ. विजय काळे, वाशिम, गोपाल मापारी, बुलडाणा, इरफान शेख, चंद्रपूर, अनंत राऊत, पुणे, डॉ. दिपक मोहळे, वर्धा, प्रियांका गिरी, मूर्तिजापूर, गोविंद पोलाड, अमरावती यांच्या सहभाग राहणार आहे.  


           

समुपदेशनात्मक टॉक शो

आजच्या तरुणाईला दिशा देणारा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, ’हो, आहे माझा बॉयफ्रेंड!’ हा समुपदेशनात्मक टॉक शो संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. यामध्ये समाज माध्यम अभ्यासक पुणे येथील मुक्ता चैतन्य,  शैलजा वाघ-दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा, राजा आकाश, समुपदेशक, नागपूर, डॉ. आशा मिरगे, माजी महिला अयोग सदस्या, मुंबई यांच्या सहभाग असणार आहे. पालक, विद्यार्थी, आजी-आजोबा आणि शिक्षकवृंदांनी अवश्य ऐकावा असा हा टॉक शो असणार आहे. 



सोशल मीडियावर परिसंवाद  

युवकांना जागरुक करण्याच्या दृष्टीने ’सोशल मीडियावर व्यक्त होताय? जरा जपून!’ या परिसंवादाचे आयोजन  दि. 6 नोव्हें. दुपारी 2.30 वाजता करण्यात आले. यामध्ये युवराज पाटील, लातूर, हबीब भंडारे, औरंगाबाद,  समीक्षाराजे खुमकर, अनंत नांदुरकर, अमरावती यांचा सहभाग असणार आहे. तर अध्यक्षस्थानी नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रा. पृथ्वीराज तौर हे राहणार आहेत.     


          

युवा आयकॉन पुरस्काराचे होणार वितरण 

 

युवा साहित्य संमेलनात युवा आयकॉन पुरस्काराचे वितरण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील तर आ. विप्लव बाजोरिया, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे हे राहणार आहेत. 



समारोप समारंभ 

या संमेलनाचा समारोप समारंभ आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. संमेलनाध्यक्ष अरविंद जगताप हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. 



टिप्पण्या