Mahatma Gandhi-kalicharan maharaj: काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी साडे चार तास ठिय्या दिल्यानंतर कालीचरण महाराजांवर अकोल्यात गुन्हे दाखल; प्रकरण रायपूर पोलिसांकडे वर्ग!





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : रायपूर येथे रविवारी पार पडलेल्या धर्मसभेत अकोला येथील मूळ रहिवासी कालीचरण महाराज यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या संदर्भामध्ये सोमवारी अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास इन्कार केल्याने पदाधिकाऱ्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिल्यानंतर अखेर साडे चार तासानंतर पोलिसांनी या अर्जाची दाखल घेऊन कालीचरण महाराजांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ही तक्रार रायपूर (छत्तीसगड) पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती आहे.


कालीचरण महाराजांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून तत्काळ भारतीय दंड विधान कलम 153 अ,कलम 499, 500,295, 298,425,427 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी यांनी सुरुवातीला केली होती. मात्र घटनास्थळ अकोला येथील नसल्यामुळे यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे सांगून पोलिसांनी तक्रार अर्ज फेटाळून लावला होता.



यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी महात्मा गांधीजींचा फोटो हातात घेऊन पोलिस ठाण्यासमोर सायंकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले. ' रघुपती राघव राजाराम ' हे गीत गात शांतीच्या मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. तब्बल साडेचार तास पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी काँग्रेस पदाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कालीचरण महाराजांविरुद्ध रात्री गुन्हा दाखल केले. यानंतर गुन्हा रायपूर पोलिसांकडे वर्ग केला.



दरम्यान,पोलीस अधिकारी विलास पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली होती. मात्र, जोपर्यंत कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत जागे वरून हटणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्या मुळे शेवटी कालीचरण महाराजांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, विवेक पारसकर,डॉ सुधीर ढोणे, कपिल रावदेव, राजेश भारती, अफरोज खान लोधी, प्रशांत गावंडे, नगरसेवक इरफान खान,मोईन खान,शेख नावेद, मोहम्मद युसूफ, हरीश कटारिया आदी सहभागी झाले होते.




विधानसभेत कालीचरण महाराजांवर कारवाईचा सूर उठला


दरम्यान, धर्म सभेत कालीचरण महाराजाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्यमंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. कालीचरण महाराज विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी नवाब मलिक यानी केली होती. 


महात्मा गांधीजींच्या विचारांचा सन्मान अवघ्या जगाने केला असून, 57 देशात महात्मा गांधीजींचे पुतळे उभारलेले आहेत. अशा अपमान करणाऱ्या वर कडक  कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी देखील आहे केली. संजय निरुपम यांनी सुध्दा कालीचरण महाराज यांच्यावर अटकेची कारवाई करावी,असे म्हंटले होते. सोमवारी संपूर्ण विधानसभेत कालीचरण महाराजांवर कारवाईचा सूर उठला होता. सरकारची बाजू मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले.विरोधी पक्षाने देखील समर्थन दिले,हे येथे उल्लेखनीय आहे.



हे सुद्धा वाचा: कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केले वादग्रस्त विधान; सामाजिक राजकिय वातावरण ढवळले, अटकेची केली मागणी


 

टिप्पण्या