curfew-Akola-city: new order: अकोला शहरात संचारबंदीत आणखी दोन दिवसांची वाढ; २१ पर्यंत रात्री संपूर्ण ‘संचार बंदी’







नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : काही दिवसआधी अमरावती येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अकोला शहरात 19 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश काढण्यात आले होते. यामध्ये आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून,आता 21 नोव्हेंबर पर्यंत अकोल्यात संचारबंदी कायम राहणार आहे. याबाबत उपविभागीय दंड अधिकारी निलेश अपार यांनी आज सायंकाळी नवा आदेश काढला आहे.


अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जारी करण्यात आले असून दि.२१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सायंकाळी सात वा. ते सकाळी सहा वा. पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश  उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज निर्गमित केले.


यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, दि.२१ रोजी पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दि. २१ रोजी  सकाळी सहा वाजेपर्यंत सायंकाळी सात ते सकाळी सहा या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


याकालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरु राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढविणारे, भावना भडकविणारे असे कृत्य. वक्तव्य, अफवा पसरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे.  समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही  प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. निवडणूक प्रचार संबंधित  कार्यक्रम असल्यास त्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई  करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.



याप्रमाणे 4 ते 5 लोकांना एकत्रित जमा होण्यावर बंदी असणार आहे तर संचारबंदी ही सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. या संचारबंदीमध्ये आरोग्य विषयासाठी केवळ मुभा देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये केवळ आरोग्य विषयक सेवा आणि शासकीय कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरू राहणार आहेत. तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन देखील प्रशासनच्या वतीने केले आहे. त्याच प्रमाणे प्रक्षोभक मेसेज अथवा फोटो किंवा व्हिडीओ पाठवणाऱ्यांनावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.


अमरावती हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातही संचारबंदीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी १७/११/२०२१ रोजी दिले.   


17 रोजीचा आदेश


अमरावती शहरात त्रिपुरा घटने संदर्भात तणावपूर्ण परिस्थिती होऊन संचारबंदी लागु करण्यात आली आहे. त्याअनुषगांने अकोला शाहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात सूचित केले आहे.


त्याअर्थी संपूर्ण अकोला शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दि. १७/११/२०२१ दुपारी १२.०० वाजता पासून ते दि. १९/११/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम-१४४ अंतर्गत खालील प्रमाणे जमावबंदी व संचारबंदी बाबत आदेश लागू करण्यात येत आहेत.


 *सकाळी ०६.०० ते संध्याकाळी ०७.०० वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. सदर जमावबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी चार कींवा चारपेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतीबंध राहील. तसेच विधानपरिषद निवडणुक संदर्भात नामनिर्देशन पत्र दाखल करणे याबाबत सुट राहील.


*संध्याकाळी ०७.०० ते सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत.संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील व शासकीय कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरु राहतील. सदर आदेशाचे काटेकारपणे पालन करुन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा.


12 नोव्हेंबरला अमरावतीत घडली घटना


12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. या हिंसक कारवाइचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरावतीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले होते. यावेळी सुद्धा भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड झाली होती. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच शहरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.


12 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 11, तर 13 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 24 असे एकूण 35 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे 35 गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण 188 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिली होती.



दरम्यान, मंगळवारी अकोला शहरात रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोहता मिल स्मशानभूमी नजीक काही चारचाकी वाहनांची काचे फोडल्याची वार्ता पसरली होती. सदर माहिती पसरताच भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांची भेट घेत सदर प्रकरणाचा तपास करीत तोडफोड करणाऱ्या कंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारची तोडफोड झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात अजून आली नाही आणि अफवा उडालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुद्धा काही आढळून आले नाही त्यामुळे कृपया नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रामदास पेठ पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. यासोबतच अश्या अफवा पसरविणाऱ्या कंटकांवर पोलिसांच्या सायबर सेलचे लक्ष असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सुद्धा पोलिसांनी सांगितले.



टिप्पण्या