wonderful experiences: आजचा विलक्षण अनुभव...एक सुखद...एक वाईट...

                                     File photo




अक्षय जोशी

मानवी जीवन अतिशय रोमांचकारी आणि अनुभव पूर्ण आहे कोणत्या वेळी कोणती समस्या उभी राहील किंवा रोमांचक किस्सा घडेल याचा नेम नाही. पण दैवी कृपेने मिळालेल्या या मानवी जीवनात देवाचा अंश असल्याचा एक सुखद अनुभव आज (सोमवारी रात्री) अनुभवायला मिळाला.




काही कामा निमित्त रात्री रणपिसे नगर मधून डाबकी रोड कडे जात होतो. रस्त्यात अभाविपचे कार्यकर्ते वॉल रायटिंग करतांना भेटले. त्यांच्याशी बोलून पुढे जातोच तर निशांत टॉवर समोर रस्त्याचा कडेला एक महिला रस्त्यावर झोपलेली दिसली. ती महिला गरोदर होती आणि अचानक प्रसुती वेदना सुरु होऊन, त्याच ठिकाणी कोणत्याही डॉक्टर नर्सच्या अनुपस्थिती मध्ये एका गोड निरागस आणि मंगळवारच्या दिवशी आई जगदंबेच्या कृपेने एका छोट्या छकुलीचा जन्म झाला.




रात्रीचे 12:30 वाजलेले काही मिनिटा आधीच प्रसूती झालेली बायको आणि हातात मुलगी रस्त्याच्या कडेला बसून कोणी मदतीला येईल का म्हणून आशेने वाट पाहणारा तो गरीब बाप. म्हातोडीच राहणार हे कुटुंब. रात्री दुचाकीहुन दवाखान्यात जायला आले. पण रस्त्यातच बायकोला वेदना सुरु झाल्या म्हणून थांबले; आणि असहाय्य वेदना होत आहेत म्हणून जीवाचा आकांत करणारी बायको पाहून स्थब्द झालेल्या त्या काकांच्या डोळ्यात पाणी आलेलं. आणि त्यात एका गोड मुलीचा बाप झाल्याचं सुख. ही रस्त्यावर झोपलेली बाई बघून आम्ही सगळे थांबलो. डॉ. वखारिया सरांच्या दवाखान्यातील नर्स आणि स्टाफला बोलावून पुढील प्रक्रिया पूर्ण करून आई आणि बाळाला जिल्हा स्त्री रुग्णालयात भर्ती केलं.




अडचणीच्या काळात अनोळखी असलेले हे पोरं धावपळ करत आहेत, हे पाहून त्या काकांना अश्रू अनावर झाले. पण आपल्या बायकोचा आणि मुलीचा जीव वाचला हे पाहून समाधान ही त्यांच्या चेहऱ्यावर होते. आयुष्यात कोणती वेळ कधी येईल हे कधीच सांगता नाही येत. आज पहिल्यांदा जन्म कसा होतो, आई बाळाच्या जन्मा करता किती वेदना सहन करते आणि जन्मानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याचं भाग्य लाभलं. भगवंताने ही शक्ती एका स्त्रीलाच का दिली असावी, असा प्रश्न नेहमी पडायचा पण आजचा अनुभव बघता पुरुषांमध्ये एवढी सहनशिलताच नाही म्हणून सृष्टी निर्माणच दैवी काम भगवंताने फक्त स्त्रीला दिलं आहे हे समजून चुकलं. त्यामुळे तिचा आदर सन्मान आणि तिची सेवा आपल्या हातून ही झालीच पाहिजे.



वाईट अनुभव


या संपूर्ण प्रकरणात एक वाईट अनुभव आला तो जिल्हा स्त्री रुग्णालयात पेशन्ट ला दाखल करतांना अतिशय मुजोर आणि निष्काळजी पणाचा कळस गाठलेली शासकीय व्यवस्था पाहायला मिळाली. रुग्ण दारात उभा असताना साधा एक कर्मचारी सुद्धा येऊन पाहायला तयार नाही. रुग्णालयांना इतकी साधनं दान केली जातात. पण ऐन वेळेवर साधं एक स्ट्रेचर मिळू नये आणि विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तर ही लोक देतात. रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पाऊल उचलायची सोडून धावपळ रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी न करता आमच्या सारख्या बाहेरच्या लोकांना करावी लागली. आणि अडचणीच्या काळात सहकाऱ्याची भूमिका न घेता फक्त अरेरावी आणि उद्धट वागणूक देणार हे रुग्णालय प्रशासन अतिशय घृणास्पद वाटतं.




अखेर त्या आई आणि बाळाला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करून आम्ही तिथून निघालो. पण सेवा भाव मनात ठेवून काम करणाऱ्या या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देव माणुसकीचे पाठ शिकवो आणि बिथरलेली व्यवस्था सुधारून गरीब गरजू रुग्णांना देखील सन्मानाने वैद्यकीय सेवा मिळो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.



यावेळी माझ्या सोबत भाजपचे कार्यकर्ते हर्षल अलकरी,अभाविपचे कार्यकर्ते विराज वानखडे, देवाशिष गोतरकर, जय आढे, मयुरेश हुशे, कौशल राऊत, आदित्य केंदळे, राजू भाऊ  होते.


                                      अक्षय जोशी

                                          अकोला



टिप्पण्या