diwali 2021: Deepavali:India: चाहूल दिवाळीची: बळ, बुद्धी, धन वृद्धी करणाऱ्या कार्तिक महिन्याला 21ऑक्टोबर पासून प्रारंभ


Diwali 2021: Kartik Month, which increases strength, intellect and wealth (file photo)





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची शीतलता... हवेतील मंद गुलाबी गारवा हिवाळा ऋतूची चाहूल देत कार्तिक मासचे  (महिना) आगमन होते. या महिन्याची आबालवृद्ध वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात सर्वांच्या आवडीचा दिवाळी सण असतो. यामुळे वातावरणात आनंद आणि उत्साह पसरलेला दिसतो. या महिन्यात आहार आणि विहाराचे नियम पालन केल्यास बळ, बुद्धी आणि धन वृद्धी होत असल्याने हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्व आहे. यंदा कार्तिक महिना 21 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत आहे.





हिंदू धर्मामध्ये तर कार्तिक महीना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. चातुर्मासाचा शेवट असतो. आरोग्यवर्धिनी श्रीतुळशी माता आणि भगवान शाळीग्राम विवाह या महिन्यात असतो. भगवान श्रीविष्णू आणि माता श्रीलक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. या संपूर्ण महिन्यात श्रीलक्ष्मी-श्रीनारायण यांची श्रद्धेने पूजा आराधना करणाऱ्यांवर कधीच आर्थिक संकट येत नाही, अशी मान्यता आहे. भगवान कार्तिकेयची देखील काही राज्यात कार्तिक महिन्यात विशेष पूजन केल्या जाते.




कार्तिक मासचे महत्व

                                      file photo



पुराणामध्ये असे म्हंटले आहे की, कार्तिक महिना भगवान श्रीविष्णू आणि माता श्रीलक्ष्मीचा यांचा सर्वात आवडता आहे. या महिन्यात भगवान विष्णू योग निद्रेतून उठून आपली कृपा सर्वांवर ठेवतात. याच महिन्यात माता लक्ष्मीचे पृथ्वीवर वास्तव्य असते. स्वछता राखणारे नीटनेटके व प्रामाणिक राहणाऱ्या लोकांवर लक्ष्मी मातेची विशेष कृपा बरसते. या महिन्यात माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात,असे म्हंटले जाते. तर काही ठिकाणी भगवान कार्तिकेयची आराधना या महिन्यात केली जाते.




तुळशी विवाह

Tulsivivah:Indian festival:file photo




हिंदू धर्मामध्ये श्रीतुळशी पूजेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात तुळशी या आरोग्यदायी वनस्पतीची नित्यपूजा केली जाते. कार्तिक महिन्यात तुळशीची विशेष पूजा  केली जाते. विशेषतः या काळात केलेली पुजा जास्त फलदायी असल्याचे म्हंटल्या जाते. शाळीग्रामच्या रूपात भगवान श्रीविष्णू आणि श्रीतुळशीचा विवाह केला जातो. दिवाळीच्या पाच दिवसांचा उत्सवाला लागूनच तुळशी विवाह केल्या जातो. तुळशी विवाहनंतरच घरात मंगल कार्याची सुरुवात केली जाते. तुळशीची पूजा केल्याने यमदूतांची भीती संपते, अशी मान्यता आहे. या महिन्यात दीप दान केल्याने मनुष्य आयुष्यमान होवून अकाली मृत्यू टळतो, अशी देखील मान्यता आहे.





आहार-विहारात बदल

                                      file photo



कार्तिक महिना हा आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे.या महिन्यात शरीर स्वास्थ्य सह मानसिक आरोग्य देखील बळकट होते. यासाठीच हिंदू धर्मामध्ये कार्तिक स्नान, अभ्यंग स्नानचे महत्व सांगितले आहे. आहार आणि विहारातही बदल  होतात. कार्तिक महिन्यापासून हिवाळा प्रारंभ होत असल्याने या महिन्यापासून आहारात स्निग्ध पदार्थाचे सेवन करण्यास सांगितले आहे. तर या महिन्यात कडधान्ये खाण्यास आणि दुपारी वामकुक्षी घेण्यास  मनाई केली आहे. पहाटे उठून नित्य कर्म आटोपून मोकळ्या हवेत फिरल्यास बल बुद्धीत वृद्धी होवून मनुष्य सुखी वैभव संपन्न जीवन जगू शकतो, असे शास्त्रात सांगितले आहे. यासाठीच कार्तिक महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले गेले आहे.

टिप्पण्या