Political news: जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात, कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर; आमदार रणधीर सावरकर यांची ठाकरे सरकारवर टीका






अकोला: केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.



मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली, त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर एकशे साठ कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी दीडशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता. राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले जात आहे, पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, असा आरोप अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केला. 




राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना या फसवणुकीचा फटका बसत असताना ठाकरे सरकार मात्र, पाहणी दौऱ्याच्या नावाखाली मर्सिडीझमधून पर्यटन करण्यात दंग आहे, अशी टीकाही आमदार सावरकर यांनी केली.




कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टी सारख्या संकटामुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार आहे, अशी टीका आमदार सावरकर यांनी केली आहे.



खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र रसातळाला चालला असताना कोविडचे कारण सांगत जनतेस घरात डांबून ठेवून स्वतःची कातडी वाचविण्याचे सरकारचे कारस्थान आता उघड झाले आहे, असे देखील सावरकर म्हणाले.

टिप्पण्या