Maharashtra: Let's go to school kids: "चला मुलांनो शाळेत चला" 17 ऑगस्टपासून शाळा भरणार…,जाणून घ्या नियमावली

                      शिक्षण         

             नीलिमा शिंगणे-जगड

                                   (file photo)



अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग  17 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परवानगी व मान्यता दिली असून, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना देखील मंगळवारी जारी केल्या आहेत. 'चला मुलांनो शाळेत चला' ही मोहीम देखील आता शिक्षण विभाग राबविणार आहे.


शाळा सुरू करावी की नाही, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पालकांचे ऑनलाइन सर्वेक्षण देखील केले होते. यामध्ये जवळपास 81.18 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शविली होती. मात्र आता कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने निर्बंधही बऱ्याच प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी जुलैमध्ये करोनामुक्त ग्रामीण भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत.


जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुुंबई, मुंबई उपनगर, ठाण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्‍त, तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यांत शाळा सुरू करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी घेणार आहेत. महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी लागणार आहे. यात वॉर्ड ऑफिसर, महापालिका वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांचा समावेश असणार आहे. नगरपंचायत, नगरपालिका ग्रामंपचायत स्तरावर शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करणार आहे. यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार आहे.




अशी आहे नियमावली


*सकाळ, दुपार या दोन सत्रात शाळा भरणार


*वर्गातील एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार


*दोन बाकामध्ये किमान सहा फूट अंतर ठेवणे असणार


*शिक्षकांचे लसीकरण बंधनकारक

शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटी-पीएसीआर चाचणी आवश्‍यक


*विद्यार्थ्याला शाळेत नेण्यासाठी पालकांची संमती घेणे गरजेचे


*परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर गर्दीच्या कार्यक्रमावर कडक निर्बंध


*शिक्षक व पालक बैठक ऑनलाइन घ्याव्या लागणार


*कोणत्याही कारणास्तव पालकांना शाळा परिसरात येण्यास बंदी राहणार.





टिप्पण्या