Team India: Cricket:Time Table: भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक: जानेवारी 2022 पर्यंत क्रिकेटप्रेमींना सामन्यांची पर्वणी; पण खेळाडूंची दमछाक!

                 

                 क्रीडांगण

      ॲड. नीलिमा शिंगणे-जगड


 File photo: (Photo source:BCCI)




कोरोना महामारीमुळे मागील वर्षी अनेक क्रिकेट स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते. आता कोरोनातुन जग सावरताना दिसत असल्याने स्पर्धाचे एका पाठोपाठ एक आयोजन करण्यात येत आहे. याच वेळापत्रकही क्रिकेट  चाहत्यांपर्यंत पोहोचले आहे. क्रिकेट स्पर्धाचे हे अतिशय व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसते. मात्र, क्रिकेटप्रेमीं साठी ही पर्वणी ठरणार आहे. जानेवारी 2022 पर्यंत एकापाठोपाठ एक स्पर्धा असल्याने कोरोना काळात क्रिकेट सामने पाहण्यापासून वंचित राहिलेल्या क्रिकेट प्रेमींसाठी हा मोठा उत्सवच ठरणार आहे. भारताचा एक संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. तर दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे.



श्रीलंका दौरा

श्रीलंका दौऱ्यात भारत एकूण तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13 जुलैपासून या मालिकेला सुरुवात होईल. हे सामने 25 जुलैपर्यंत राहतील. या मालिकेसाठी संघात देवदत्त पडिक्कल, मनिष पांडे, नितीश राणा, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायवाड, शिखर धवन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गॉथम, कृणाल पंड्या, इशान किशन, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, चेतन साकरिया, दीपक चहर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, राहुल चहर, वरुण चक्रवर्थी आणि यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे.


इंग्लंड दौरा

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. 4 ऑगस्टपासून सुरु होणारी ही मालिका 14 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. भारतीय संघात विराट कोहलीच्या नेतृत्वात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमान विहारी, केएल विहारी, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, अक्षर पटेल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, स्रीकर भारत, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.



आयपीएल स्पर्धा:उर्वरित सामने 

या दौऱ्यानंतर आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. युएईत हे सामने खेळवले जाणार आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरु होणार असून उर्वरित 31 सामने खेळवले जाणार आहे. यासाठी 21 दिवसाचे वेळापत्रक मांडण्यात आले. या 21 दिवसात 10 डबलहेडर्स, 7सिंगल हेडर्स आणि 4 प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहेत. टी- 20 विश्वचषकाच्या दोन दिवस आधी ही स्पर्धा संपणार, असे नियोजन करण्यात आले आहे. कारण T-20 वर्ल्डकप स्पर्धा देखील कोरोना उद्रेकामुळे पुढे ढकलली होती.



टी-20 विश्वचषक स्पर्धा


File photo: (Photo source:BCCI)

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत युएईत टी-20 विश्वचषकाचे आयोजन केले आहे. मागील वर्षी करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवाल नुसार, राऊंड 1 मध्ये 12 सामने होणार असून, त्यामध्ये 8 संघ खेळतील. 8 पैकी 4 संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील. सुपर 12 साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत एकूण 30 सामने होणार आहेत. ही फेरी 24 ऑक्टोबर पासून सुरू होईल. सुपर 12 फेरीत 6-6 संघांना दोन स्वतंत्र गटात विभागले जाईल. सुपर 12 नंतर 3 प्लेऑफ सामने, 2 उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळला जाईल, याची नुकतीच बीसीसीआयने घोषणा केली आहे.



भारत-न्यूझीलंड मालिका

T-20 स्पर्धा संपताच भारतीय संघाची न्यूझीलंडसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्या जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौरा, इंग्लंड दौरा, आयपीएल आणि टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडसोबत खेळणार आहे. मात्र, या मालिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.



भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचे डिसेंबर-जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. यात तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन टी- 20 सामन्यांची मालिका असणार आहे. 




टिप्पण्या