School reopening: कोविडमुक्त भागातील शाळा सुरू होणार; आठवी ते बारावीचे वर्गासाठी परवानगी

                                     file image




मुंबई: कोविडमुक्त भागात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ष सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी आज सोमवार 5 जुलै रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.




कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून राज्यातील शाळा बंद असून टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत सरकारकडून अनेकदा नियमावली जाहीर करण्यात आली. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता काही अंशी सुरू झालेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता राज्यात लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल केल्यानंतर केवळ कोविडमुक्त भागातील शाळा सुरू करता येऊ शकतात, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.



याबाबत संबंधित ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना काही निकषांच्या आधारे शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.


काय आहेत निकष

                                     file image


1. कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांशी चर्चा करुन ठराव करावा.


2. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. प्राधान्याचे विषय ठरवून वेळापत्रक तयार करण्यात यावे.


3. एका बेंचवर केवळ एकच विद्यार्थी बसू शकतो. तसंच एका वर्गात एकावेळी केवळ 15-20 विद्यार्थी बसू शकतील.


4. दोन बेंचमध्ये किमान सहा फूटाचे अंतर हवे.


5. प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे.


6. शाळेतील शिक्षकांच्या राहण्याची सोय गावात करावी. किंवा शिक्षकांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करावा लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.


7. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी.


पालकांनी कोणती काळजी घ्यावी?


राज्य सरकारने आपल्या शासन निर्णयामध्ये पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत काही सूचना केल्या आहेत.


1. आजारी असललेल्या आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नये.


2. कुटुंबातील व्यक्तींनी नियमितपणे वाफ घ्यावी व इतर दक्षता घ्यावी.


3. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे.

टिप्पण्या