अकोला: कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची ही वेळ नसून मराठा आरक्षणासाठी आता कायद्याची लढाई लढणे गरजेचे आहे,असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी आज अकोला येथे व्यक्त केले.
मराठा समाज जनसंपर्क दौरा अंतर्गत सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी अकाेला शहर मधील मराठा मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संभाजी राजे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मागासवर्गीय आयोग नेमणे हाच आता पर्याय असून, त्यासाठी भोसले समितीच्या सूचना राज्यपालांकडे सादर करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानंतर यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा आणि केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडे प्रस्ताव सादर करुन वटहुकूम काढावा.
मराठा आरक्षणासाठी समाजातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले.
राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करा अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली. मराठा आरक्षण हा वादाचा नाही तर पर्यायाचा विषय आहे त्यामुळे अधिवेशन हे दाेन दिवसांचे असले तरी किमान दाेन तास चर्चा करायला हरकत नाही, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा