Crime news: मास्क न घालणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू; पीएसआयसह तीन पोलीस निलंबित

                                      file image



नागपूर : मास्क न घालणाऱ्या मनोज ठवकर या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणी पीएसआयसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे यांनी सुध्दा मनोज ठवकर मृत्यू प्रकरणी  पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. 



नागपूर मधील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली होती. यानंतर या तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.



प्रकरणाची पार्श्वभूमी


35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास विना मास्क मनोज याच मार्गाने घरी चालला होता. दरम्यान पोलिसांनी मनोजची दुचाकीही थांबविली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर येवून धडकली.




मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीसानी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मनोजला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आले होते.




पोलिसांच्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर रुग्णालय परिसरात त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मनोजच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई , पत्नीला सरकारी नोकरी आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी जमावाने केली होती. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटल परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद जनमानसात उमटले होते.



टिप्पण्या