Akola Rain live update:पावसाचा कहर: बच्चू भाऊंनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी; मोर्णा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे दिले निर्देश; अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मिळणार तातडीने मदत


अकोला: पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ना.बच्चू कडू




अकोला: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पूर येवून नदीकाठच्या गावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त भागातील खडकी, हरिहर पेठ, शिवसेना वसाहत हे भाग व रिधोरा (बाळापूर) चांगेफळ व सुकळी या गावांना भेटी देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून दिलासा दिला.




भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी उपाययोजना राबवाव्या व मोर्णा नदीचे खोलीकरण करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी  दिले.




जिल्ह्यातील नदीकाठावरील व पूराबाधीत भागाची पाहणी केली. यावेळी आमदार  नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, बाळापूरचे रामेश्वर पूरी, तहसिलदार अरखराव उपस्थित होते.




नदीकाठच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


पुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांचे समस्या जाणून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. तसेच पाहणी दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, पुरग्रस्त भागात रोगराईचा फैलाव होवू नये याकरीता फवारणी तथा आवश्यक उपाययोजना करा. अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पुन्हा पूर येऊ नये याकरिता जिल्हा लगत असलेल्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करा. यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले. 




नुकसानीचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करा


अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे व पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करा. मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये या करीता प्रशासनाने प्राधान्याने कामे करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिले.




जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त भागातील तातडीची मदत देण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी  दिले.




जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा बैठक 


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत ना.कडू यांनी आज आढावा घेतला. 



यावेळी विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिसन बाजोरिया, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, सदाशिव शेलार, विश्वजित घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर उपस्थित होते.


आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत नागरिकांना मिळेल यासाठी प्रशासनाने काम करावे. तत्पूर्वी नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये द्या. मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये. अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेले रस्ते तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत सुरु होईल. यासाठी तत्परतेने मार्गी लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच नुकसान झालेल्या शेतीचे, पिकांचे व संपुर्ण खरडून गेलेली शेती असे वर्गीकरण करुन सर्वेक्षण तातडीने करा. यासाठी ड्रोनचा वापर करुन चित्रीकरणाचे कामे प्राधान्याने करून नुकसानीचे पंचनामे प्रशासनामार्फत शासनास सादर करण्याचे निर्देश ना. कडू यांनी दिले.


टिप्पण्या