Lockdown:Maharashtra:Unlock: सरकारने केलं स्पष्ट: राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन,मात्र विजय वडेट्टीवार पडले तोंडघशी




मुंबई, दि ३ : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील,असे राज्य सरकारने आज सायंकाळी स्पष्ट केले.





अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पे निहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्याच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल,असे नमूद केले आहे.





दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्प्यात राज्यात अनलॉक केले जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारकडून त्याबाबत स्पष्टीकरण आल्याने अनलॉक नेमके कधी आणि कसे होणार हे शासन निर्णय जारी झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.




का द्यावे लागले स्पष्टीकरण?


ना. विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी केलेली असून हे जिल्हे पाच टप्प्यात लॉकडाऊन मुक्त होतील, असेही त्यांनी सांगितले होते. या जिल्ह्यांची टप्पेनिहाय यादी देताना वडेट्टीवार यांनी निर्बंध कसे शिथिल होतील, हे देखील सांगितले होते. 




पहिल्या टप्प्यात अठरा जिल्हे अनलॉक होतील. दुसऱ्या टप्प्यात सहा, तिसऱ्या टप्प्यात दहा आणि चौथ्या टप्प्यात दोन जिल्हे अनलॉक होतील, असे देखील त्यांनी सांगितले होते. पॉझिटिव्हिटी रेट ज्या जिल्ह्यांत पाच टक्क्यांच्या खाली आहे तिथे उद्यापासून (४ जून) लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, असा निर्णय झालेलाच नाही, प्रस्ताव विचाराधीन आहे, असे आता सरकारने स्पष्ट केल्याने वडेट्टीवार तोंडघशी पडले असल्याचे दिसत आहे. 



टिप्पण्या