Parambir Singh email: ई-मेल आयडी खरा की खोटा! पण ई-मेल पत्रामुळे झाली पोलखोल!! राजकारण परत ढवळले!!!

      राजकारण: गल्ली ते दिल्ली

       ॲड. नीलिमा शिंगणे-जगड





                                       संग्रहित चित्र

परमबीर सिंग ई-मेल पत्र प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्र्यांचे वेगवेगळे निवेदनाने संभ्रमात भर





मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार पुन्हा अडचणीत सापडले. या संकटाच्या काळातही सरकारमधील विसंवाद कायम असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.




परमबीर सिंग यांच्या पत्रावर रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसार ज्या ईमेल आयडी वरून परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केला आहे तो खरंच त्यांचा ईमेल आयडी आहे का, याची शहानिशा करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. पण जर परमबीर सिंग यांच्या ईमेल आयडी बद्दल संशय होता तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधीच निवेदन प्रसिद्ध का केले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहनिशा



गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ईमेलवर काल दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृह विभागा मार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 



वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट केले आहे.



मात्र, या निवेदनापूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो ईमेल खरा मानून निवेदन देऊन टाकल्याने सरकार मधील विसंवाद उघडकीस येवून, सचिन वाझे प्रकरणाने सुरू झालेल्या याप्रकरणी आणखी संभ्रम निर्माण केला आहे.




परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गट दिल्याचा दावा केला आहे होता. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक प्रसिद्धपत्रक जारी करून आपली बाजू मांडली होती. 



काय म्हणाले देशमुख


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.



सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही 



आपणास उद्या (१७ मार्च रोजी) पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी  १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅट वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून  परमबीर सिंग यांना पद्धतशीर पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?



18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला. - पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.



परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. 


स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत. - सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? 



विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. 



स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. 



मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.असे अनिल देशमुख यानी पत्रात म्हटले आहे.




नाट्यमय घडामोडी


सचिन वाझे प्रकरणात राज्यातील उच्च अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिस आयुक्तपदी असणाऱ्या परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली.




या बदल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलातील आश्चर्यकारक बाबी समोर आल्या.  मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले असून या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. 




मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आठ पानाच्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंग यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.



मुकेश अंबानी प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी केली आहे.




सचिन वाझे प्रकरण 


25 फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटके ठेवण्यासाठी वापरलेले गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप   हिरेन यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरेन यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीची हत्या झाली असावी. अशी खात्री आहे. ही हत्या सचिन वाझे यांनी केली असावी. असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. 




या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी एटीएसकडे देण्यात आली. मात्र, अंबानीच्या घराबाहेरील स्फोटकांचा चौकशीचे प्रकरण एटीएसकडे असताना एनआयएने हे प्रकरण स्वत:कडे घेतले. त्यानंतर त्यांनी सचिन वाझेची चौकशी केली. या चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली. वाझे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने वाझे यांना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाझे यांना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौकशी दरम्यान वाझे यांनी मोठे खुलासे केले असल्याचे एनआयएने म्हटले होते.




खरा सूत्रधार कोण?

आता या सर्व घडामोडी घडवून आणण्यामागे खरा सूत्रधार कोण,याबाबत चर्चेला उधाण आलेले आहे. संशयाची सुई आता विरोधकांकडे देखील वळली आहे. आवाज उठविणारे देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर झाडात आहेत. मात्र, या सर्व स्वार्थी राजकारणात सामान्य जनता भरडल्या जात आहे. वास्तविक पाहता विकासकामांवर कोणताच राजकीय पक्ष बोलताना दिसत नाही.जनतेची बाजू ठाम मांडणारे सक्षम नेते दिसत नाहीत, एवढे मात्र निश्चित. 
















टिप्पण्या