Covid19 test: भाजीपाला, दुग्ध, किराणा व्यवसायिक अश्या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी अनिवार्य - पालकमंत्री बच्चू कडू



भारतीय अलंकार 24

अकोला: जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  भाजीपाला विक्रेते, दुग्ध, किराणा व किरकोळ व्यवसायी अशा थेट संपर्कात येणा-या व्यक्तीची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले.


आज जिल्हाधिकारी भवनाच्या नियोजन भवनात कोविड-19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी  विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया , आमदार अमोल मिटकरी, नितीन देशमुख, मनपा आयुक्त निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उप अधिष्ठात  डॉ. कुसूमाकर घोरपडे, अपर पोलिस अधीक्षक मोनिका  राऊत यांची उपस्थिती होती.


कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  नागरिकांच्या कोविड चाचण्या  वर भर देणे आवश्यक असुन पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील त्यांचे कुटुंबीय व इतर व्यक्तींचा कॉन्टॅक्ट ट्रेस करून कोविड चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच होम क्वाॅरनटाईन केलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून  ते बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासारख्या उपाययोजना कराव्यात तसेच  ज्या व्यक्तींच्या घरी  होम क्वाॅरनटाईनची व्यवस्था नसेल अशा व्यक्तींना  संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे.  लग्न समारंभावर लक्ष ठेवून नियमाचे उल्लघंन करणा-यांवर कार्यवाही करावी.


आठवडी बाजार  स‌द‌्यस्थितीत  बंद आहेत परंतू भविष्यात आठवडी बाजार  सुरू करण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आठवडी बाजारात  येणा-या  दुकानदार  व व्यापारी यांची  कोरोना चाचण्या कराव्यात व आठवडी बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात.


 कायदा व सुव्यवस्थेचा आढावा


पालकमंत्री ना. बच्चु कडू यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाबत आढावा घेतला. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारु विक्री नियंत्रणात आणण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले. पोलिस स्टेशनमध्ये वाचनालय व  व्यायाम शाळा असणे गरजेचे असून यासाठी नियेाजन करावे. अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरात कोणी भिकारी  भिक मागतांना  दिसणार  नाही  यासाठी मनपा व पोलिस विभागाने संयुक्त कार्यवाही करून  भिकारी मुक्त शहर ही योजना राबवावी व  भिकारी यांना निवारा केंद्रात  पोहचवून त्यांच्यावर संस्कार करावेत असेही त्यांनी सांगितले.


पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी  जलजीवन  मिशन योजनेचा आढावाही यावेळी घेतला.


शनिवार व रविवारचे लॉकडाऊन रद्द


जिल्ह्यातील शनिवार व रविवारचे लॉकडाऊन रद्द करुन सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत निर्बंधासह सुरु ठेवण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,   भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण,   कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू यांनी दिले.


कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून दि. 4 मार्चच्या आदेशाव्दारे येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारीचे रात्री आठवाजेपासून ते सोमवारचे सकाळी सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. यापूर्वीच्या आदेशातील संचारबंदीचा मुद्दा पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू  यांच्या निर्देशानुसार रद्द करुन इतर बाबी पुढील निबंर्धासह सुरु राहिल. तसेच कोविड-19 चा फैलाव होवू नये, या करिता वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेले आदेशांचे उललंघन होणार यांची दक्षता घ्यावी, असे  अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या