Jayant Patil: Akola: सद्यस्थितीत सुरु असलेल्या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद -जयंत पाटील

जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: सद्यस्थितीत सुरु असलेल्या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल, असे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी सांगितले.


आज अकोला जिल्ह्यात जलसंपदा विभागा अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांचा ना पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.


याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख उपस्थित होते.



जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अमरावती विभागाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे,  अकोला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सु. गो. राठी, अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चि. वि. वाकोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली.  जिल्ह्यात एकूण ३९ प्रकल्प पुर्ण झालेले असून १४ प्रकल्प बांधकामाधीन आहेत तर सात प्रकल्प हे अन्वेषणाधीन आहेत, असे एकूण ६० प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांद्वारे एक लक्ष ७५६ हेक्टर सिंचन क्षमता करण्याचे नियोजन आहे. तर आतापर्यंत ६१ हजार ५६१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 



जिल्ह्यात बांधकामाधीन मध्यम प्रकल्पांतर्गत पूर्णा बॅरेज-२ (नेरधामणा), घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा, उमा बॅरेज  या प्रकल्पांची  सद्यस्थितीबाबतही माहिती देण्यात आली. हे प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्णत्वाचे नियोजन आहे, अशीही माहिती देण्यात आली. तसेच प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत माहितीही देण्यात आली. 


प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबवा


या आढाव्यानंतर ना. पाटील यांनी सांगितले की,  सद्यस्थितीत सुरु असलेल्या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. प्रकल्पांमधील पाणी हे सिंचनासाठी पोहोचविण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबवून कामे सुरु केली जावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.



टिप्पण्या