Farmer protest: केंद्रीय कृषी कायदे सरकारला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही; शरद पवार यांचा मोदी सरकारला इशारा



भारतीय अलंकार 24

मुंबई: मोदी सरकारने आणलेले केंद्रीय कृषी कायदे अन्यायकारक आहेत. त्याविरोधात शेतकऱ्यांनी उभा केलेला संघर्ष पाहता हे कायदे सरकारला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. 


मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही पवारांनी कान उघडणी केली.


राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे

"तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण  माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे राज्यपाल भेटले, ” अशी जोरादार टीका शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.


राज्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी धुळे-नंदुरबार इथूनही उन्हातान्हाचा विचार न करता संबंध शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी शेतकरी व कष्टकरी मुंबईतील आझाद मैदान इथे आलेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांची कवडीची अस्था आहे का? शेतकऱ्यांची पंतप्रधानांनी चौकशी केली का? असे खडे सवालही शरद पवारांनी उपस्थित केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.


पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यु.पी. तसेच राजस्थान इथल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जे अभूतपूर्व आंदोलन केलं त्या शेतकरी व कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेल्या या समुदायाचे पवार यांनी अभिनंदन केले.या आंदोलनात पंजाबचा शेतकरी आहे ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात जबरदस्त योगदान दिले. जालियनवाला बागमध्ये प्राणार्पण केलं. स्वातंत्र्यानंतर हा शेतकरी हाती बंदुक घेऊन चीन व पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात देशाच्या भूमीचं रक्षण करायला पुढे आला,असे देखील पवार म्हणाले.


भाषणातील इतर ठळक मुद्दे


*ही मुंबई नगरी आहे. मुंबईने स्वातंत्र्यलढ्यात आक्रमक भूमिका घेतली होती व स्वातंत्र्यलढ्याला योगदान दिले. त्यानंतर मराठी भाषकांच्या राज्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला. आज ही मुंबई पुन्हा शेतकरी व कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पुढे आली आहे. 


*देशातील १२० कोटी लोकांचं दोन वेळचं अन्न देणारा हा बळीराजा. या शेतकऱ्याच्या विरोधात नाकर्तेपणाची भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याचा निषेध आहे. 


*केंद्र सरकारच्या विरोधात ही भूमिका का घेतली? २००३ मध्ये या कायद्याची भूमिका मांडली गेली. तेव्हा आमचं सरकारमध्ये कुणी नव्हतं. आम्ही केंद्र सरकारमध्ये आल्यावर मी स्वतः सर्व राज्यातील शेती मंत्र्यांची तीनवेळा बैठक घेतली व कृषी कायद्याची चर्चा केली. पण ही चर्चा पूर्णत्वाला गेली नाही. त्यानंतर भाजपाची राजवट केंद्रात आल्यावर त्यांनी कोणतीही चर्चा न करता कायदे आणले. मला आठवतंय की संसदेत एका दिवसात तीन कायदे मांडले गेले व त्याच दिवशी ते मंजूर झाले पाहिजेत असा आग्रह त्यांनी धरला. 


*विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या कायद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. शेतकऱ्याच्या जीवनावर विपरीत परिणाम करणारा हा कायदा आहे. त्यामुळे आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही, आम्हाला चर्चा हवी आहे असा आग्रह धरला.


*कायद्याची सखोल चर्चा करण्यासाठी स्वतंत्र सिलेक्ट कमिटी असते. या कमिटीकडे हा कायदा पाठवा अशी विनंती आम्ही केली. सिलेक्ट कमिटीत सगळ्या पक्षाचे लोक असतात. त्यात चर्चा होऊन एकमताने निष्कर्ष काढले जातात. 


*शेती कायद्यासाठी हा मार्ग होता. पण केंद्र सरकारने चर्चा न करता, कमिटी स्थापन न करता आम्ही मांडलेला कायदा जशाच्या तसा आणावा असा आग्रह धरला. हा घटनेचा व संसदेचा अपमान होता. 


*घटनेची पायमल्ली करून हा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. संसदीय संकेत उद्ध्वस्त करत बहुमताच्या जोरावर कायदा पास करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या देशातला सर्वसामान्य माणूस हा कायदा व तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त करेल. 



*शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वगळता हमीभाव देण्याचे काम आम्ही केले होते. पंजाबच्या शेतकऱ्यांनी संबंध देशाला पुरेल इतका गहू, तांदूळ उत्पादित केला असता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मालाची १००% खरेदी करण्यास सांगितले. पण आताचे सरकार खरेदी करायला तयार नाही.

******

क्षणचित्रे:




******


















टिप्पण्या