Winter session :विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडतं याचे मुहूर्त काढण्यातचं गेलं-उध्दव ठाकरे

 




भारतीय अलंकार

मुंबई:  विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडतं आणि सरकार कधी पडणार याचे मुहूर्त काढत बसण्यातच गेलं. त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारने काय काय कामं केली हे बघितले नसेल. काही दिवसांपूर्वी याच सभागृहात गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केले, त्याची पुस्तिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे,असे वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.


मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 



कुठेही जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असण्याचा सूर नाही आहे. पण, विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या आधी विरोधी आहे, त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं. ते म्हणतात, राज्यात अघोषित आणीबाणी आहे. मग, देशात घोषित आणीबाणी आहे का,असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित केला. 



ज्या पद्धतीने शेतकरी तिकडे त्यांच्या न्यायहक्कांसाठी ठाण मांडून बसले आहेत, त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं, या गोष्टी सोडाच परंतु भर थंडीमध्ये त्यांना उघड्यावर बसावं लागतं, त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जातात हे मला नाही वाटत सद्भावनेचं लक्षण आहे. आपल्या अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला देशद्रोही ठरवणे, अतिरेकी ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपल्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट बोलण्याऐवजी त्यालाच देशद्रोही, अतिरेकी, चिनी, पाकिस्तानी म्हणायचं?,असा टोला देखील ठाकरे यांनी लगावला. 



आम्ही वेळोवेळी मराठा समाजातील विविध संघटनांशी चर्चा करतोय, त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतोय, वकिलांशी चर्चा करतोय आणि सर्वानुमते कोर्टात जे काही मांडायचं आहे ते मांडलं जातं. मराठा समाजाच्या न्यायहक्काची लढाई जी आता कोर्टात चालू आहे, ती पूर्ण ताकदीने सरकार लढत आहे. ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कारण त्यांच्या हक्काचं जे काही आहे, त्यातील एक कण सुद्धा आम्ही कुठेही कमी करणार नाही, कमी होऊ देणार नाही. जे काही त्यांच्या न्यायहक्कांचं आहे, ते देण्याबाबत त्यांच्याही विविध संघटनांशी आमची चर्चा होत आहे,असे देखील ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 




दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस 




राज्याचे दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन  यंदा कोरोनाच्या परिस्थितीत नागपूर ऐवजी मुंबईला होत आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आयोजित केला होता. मात्र, सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे. 


कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारला आलेलं अपयश, शेतकऱ्यांना विशेषत: ओला दुष्काळाचा फटका बसलेल्यांना मदत न मिळणं अशा विषयांमुळे भाजपने बहिष्कार टाकला. दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 













टिप्पण्या