MGVaidhya: व्यासंगी व्यक्तिमत्त्व: राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचे निधन



अधि. नीलिमा शिंगणे-जगड

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जेष्ठ स्वयंसेवक आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचे आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) असा मोठा आप्त परिवार आहे.




माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख होते. तसेच १९७८ साली ते विधानपरिषदेचे सदस्यही होते.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली


संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते. 'नागपूर तरुण भारत'चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.


विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद मिळाले आहेत.


खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.


संस्कृतचे व्यासंगी

मा.गो. वैद्य उर्फ बाबूराव वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ साली झाला. वैद्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण तरोड्यात आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत झाल्यानंतर त्यांच्या मावस काकाने त्यांना नागपुरात पुढील शिक्षणासाठी आणले. अकरावी मॅट्रिकनंतर १९३९ साली त्यांनी नागपूरमधीलच मॉरिस कॉलेजमध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. संस्कृत व गणित हे विषय घेऊन त्यांनी बी.ए.ची परीक्षा विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. संस्कृत विषयात एम.ए. करण्यास त्यांना किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाली होती.



एम.ए.झाल्यावर  वैद्य न्यू इरा हायस्कूल (आताचे नवयुग विद्यालय) या शाळेत शिक्षक म्हणून लागले. याच दरम्यान महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी डॉ. रघुवीर यांना संस्कृत कोषासाठी दोन मदतनीस हवे आहेत, असे कळल्यानंतर न्यू इरा हायस्कूलमधील नोकरी सोडून त्यांनी संस्कृत कोषाचे काम सुरू केले. मात्र, पुढे काही कारणाने त्यांना हे काम सोडावे लागले.


पुढची नोकरी कुर्वे स्कूलमध्ये गणिताचे शिक्षक म्हणून आणि त्यानंतरची पब्लिक सर्विस कमिशनच्या ऑफिसात. १९४९ साली ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून लागले. मा.गो. वैद्यांनी सलग १७ वर्षे हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमातून संस्कृतचे अध्यापन केले. त्यांचे मराठी प्रमाणेच संस्कृत आणि इंग्रजीवर अद्भुत प्रभुत्व होते. त्यांनी १९६६ मध्ये कॉलेजची नोकरी सोडली होती.


मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली. त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याकाळात ते सूट बूट घालून वावरत असायचे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कधी संशय आला नाही.


हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना मा.गो. वैद्य यांनी संघाशी असलेली निष्ठा कधीही लपविली नाही. इतकेच नव्हे तर १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, या सरकारी फतव्यावर तसा करार करण्याचे बाणेदारपणे नाकारले.वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडल्यामुळे कॉलेजचे फार मोठे नुकसान झाले आहे असे कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य मोझेस म्हणाले होते. मात्र, दुसरा कसलाही विचार न करता मा.गो. वैद्य हे १९६६ मध्ये तरुण भारत या मराठी वृत्तपत्रात दाखल झाले.


पत्रकार मा. गो. वैद्य

१९६६ पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले. आणीबाणीचा काळ व त्या वेळच्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग हा मा.गो. वैद्य याच्या संपादकीय कारकिर्दीतल्या कायम आठवणीत असणारा काळ होता. आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ हा त्यांचा अग्रलेख डाक आवृत्तीत छापला गेला; पण शहर आवृत्तीत सेन्सॉर अधिकार्‍याने छापू दिला नाही म्हणून अग्रलेखाची तेवढी जागा निषेध म्हणून त्यांनी मोकळी सोडली होती. त्यावेळी मा.गो. वैद्य हे ‘नीरद’ या टोपण नावाने ते लेखन करीत. ‘चांगले राज्य चांगल्यांचे राज्य’ हा त्यांचा लेख वाचून दैनिक हितवादचे त्या वेळचे संपादक ए.डी. मणी यांनी त्यांचे आवर्जून अभिनंदन केले होते. १९७८ साली मा.गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.


लेखन आणि साहित्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक मा.गो. वैद्यांनी लिहिले आहे, ते नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्याची ई-आवृत्ती ६ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झाली. आपली संस्कृती, चांदणे प्रतिभेचे, ठेवणीतले संचित, मेरा भारत महान, रंग माझ्या जीवनाचे, राष्ट्र राज्य आणि शासन, राष्ट्र संकल्पना आणि श्रीगुरुजी, शब्ददिठी शब्दमिठी, शब्दांच्या गाठीभेटी, श्री गुरुजी एक अनौखा नेतृत्व, सुगम संघ, हिंदू समाज आणि ख्रिस्ती मिशनरी आदीचे त्यांनी लेखन केले आहे.


माहिती स्रोत:विकिपीडिया व अन्य पुस्तके




टिप्पण्या