CAA NRC: शेतकरी आंदोलनातून देश अस्थिर करण्याचा देशविरोधी शक्तींचा डाव - कपिल मिश्र यांचे वक्तव्य

सीएए-एनआरसीच्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांचा सहभाग




भारतीय अलंकार

अकोला: देशविरोधी शक्तींनी सी.ए.ए. (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि एन.आर.सी. (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) यांच्या वेळी शाहिनबागसारखी आंदोलने केली. आता तोच प्रकार शेतकरी आंदोलनाला माध्यम बनवून चालू आहे. दिल्लीनंतर देशभरातील अन्य राज्यांत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. यामागे देशविरोधी शक्ती कार्यरत आहेत; पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्याप्रमाणे दिल्लीतील दंगलीनंतर सर्व दोषींवर कारवाईचे सत्र चालू झाले. तसे शेतकरी आंदोलनाच्या वेळी कोणी देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारद्वारे कठोर कारवाई होऊ शकते, असे वक्तव्य भाजपचे नवी दिल्ली येथील नेते तथा माजी आमदार कपिल मिश्र यांनी केले.



हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्र की...’ कार्यक्रमांतर्गत ‘सी.ए.ए.-एन.आर.सी.च्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन’ या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून 46,166 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 1,46,204 लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचला.



यावेळी लेखिका आणि ‘मानुषी’ मासिकाच्या संपादक प्रा. मधु पौर्णिमा किश्‍वर म्हणाल्या की, ‘सी.ए.ए.’ कायदा आणण्यापूर्वी सरकारने विदेशातील हिंदूंवर होणार्‍या भीषण अत्याचारांविषयी श्‍वेतपत्रिका काढायला हवी होती. चित्रपट आदी माध्यमांतूनही त्या विषयी मोठी जनजागृती करायला हवी होती.  



पाकमधून भारतात आलेल्या पीडित हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी लढणारे ‘निमित्तेकम्’चे अध्यक्ष  जय आहुजा म्हणाले की, ‘सी.ए.ए.’ मुळे हजारो शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे. आपण सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हिंदुत्वाचा आवाज राष्ट्रीय स्तरावर बुलंद केला पाहिजे. 



हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते  रमेश शिंदे म्हणाले की, ‘सी.ए.ए.’, ‘एन.आर.सी.’द्वारे सरकार हिंदू राष्ट्राच्या दिशेने जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यातून हिंदु राष्ट्र म्हणजे काही तरी भयंकर असल्याचा प्रचार केला जात आहे; मात्र हे कायदे करण्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामवर आधारित देशच कारणीभूत आहेत. तेथील अल्पसंख्याकांवर होणार्‍या हल्ल्यांचे वास्तव जगभरात ज्ञात आहे. अशा वेळी हिंदु सिद्धान्तांवर आधारित आदर्श हिंदू राष्ट्रच न्याय देणारे ठरू शकते. त्यामुळे हिंदु राष्ट्र अत्यंत आवश्यक आहे.



टिप्पण्या