Politics: राजकारण: वाद पेटला :अमित शाह यांनी बिरसा मुंडांच्या नाही दुसऱ्याच पुतळ्याला घातला हार; तृणमूल काँग्रेस संतापली

      राजकारण: गल्ली ते दिल्ली


या घटनेनंतर स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी या मूर्तीवर गंगाजल घालून ती शुद्ध केली.

                                      फोटो:ट्विटर



पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेले भाजप नेते अमित शहा यांनी एका कार्यक्रमात आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या ऐवजी दुसऱ्याच पुतळ्याला हार अर्पण केल्याने वाद पेटला. त्यामुळे आता पश्चिम बंगाल मधील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांच्या भावनेला ठेच पोहचली असून या घटनेनंतर स्थानिक आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मूर्तीवर गंगाजल घालून ती शुद्ध केली. तर तृणमुल काँग्रेसने अमित शहांना `उपरा` म्हटले असून, सोशल मिडीयावर खिल्ली उडवली जात आहे.




काय आहे घटना


अमित शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. शाह यांच्या हस्ते आदिवासी बहुल बांकुरा येथे स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यावर हार घालण्याचा कार्यक्रम राज्य भाजपने आयोजित केला होता. परंतू, शहा यांनी ज्या पुतळ्याला बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून हार घातला. तो अन्य आदिवासी नेत्याचा पुतळा होता. ही चूक जेव्हा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी ताबोडतोब बिरसा मुंडा यांची प्रतिमा मागवली. प्रतिमा पुतळ्याच्या पायाशी ठेवून त्याच्यावर फुले वाहण्याचा कार्यक्रम शहा यांच्या हस्ते लगबगीने उरकवून घेतला. यामुळे आता पश्चिम बंगाल मध्ये वाद पेटला आहे. शाह यांच्या या चुकीबद्दल तृणमूल काँग्रेसने संताप व्यक्त करत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडली. अमित शाह यांना तृणमूलने 'उपरा' (बाहेरचा) असे म्हंटले आहे.  




या कार्यक्रमानंतर भाजपने सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. अमित शहा यांनी याबद्दल एक ट्विट करून आपली चूक सावरण्याचा प्रयत्न केला आहे .या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले की, "आज प. बंगालमधील बांकुरा येथे प्रसिद्ध आदिवासी नेता भगवान बिरसा मुंडा यांना फुले अर्पित केली. बिरसा मुंडा यांनी आपले जीवन आदिवासींच्या अधिकारासाठी, त्यांच्या उत्थानासाठी समर्पित केले होते. त्यांचे साहस, संघर्ष व बलिदान आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील," असा संदेश लिहिला होता. 




पण जेव्हा भाजप नेत्यांची ही बनवाबनवी लक्षात आली तेव्हा भारत जकात माझी परगना महल या आदिवासी संघटनेने या कार्यक्रमावर आक्षेप घेत भाजपने बिरसा मुंडा व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.भाजपने आम्हाला फसवले, त्यांच्या अशा कृतीने आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत, अश्या प्रतिक्रिया दिल्या. या घटनेनंतर स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी या मूर्तीवर गंगाजल घालून ती शुद्ध केली, असेही या संघटनेने सांगितले.



दरम्यान, या वादानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपवर हल्ला चढविला. येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे हे प्रयत्न सुरू असल्याची टीका तृणमूलने केली आहे. अमित शहा हे बाहेरचे असून ते बंगाली संस्कृतीबाबत इतके अनभिज्ञ आहेत की त्यांना भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा माहिती नाही. त्यांनी वेगळ्याच पुतळ्याला हार घालून सर्वांचा अपमान केला. ते बंगालच्या संस्कृतीचा सन्मान करू शकतात का?, असा प्रतिप्रश्न तृणमूलने  ट्विट द्वारा उपस्थित केला आहे. आता मात्र हा वाद आगामी निवडणूक मध्ये काय रंग भरतो,हे येत्या काळात दिसणार आहे.





टिप्पण्या