Shivsena-Aap:शिवसेना वचननामा ही तर जनतेची फसवणूक: आपची पोलिसात तक्रार

जनतेला विविध प्रकारचे आमिष दाखवून  उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. व आता जाणीवपूर्वक आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारीच्या संकट काळी विजदर वाढवून जनतेसोबत बेईमानी केली आहे. 


अकोला: महामारीच्या संकटामुळे पिडीत आणि फसवल्या गेलेल्या जनतेच्या वतीने राज्याचे  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे  आज २ ऑक्टोबर रोजी सत्याचा आग्रह म्हणून राज्यभरात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही पोलिस तक्रार अकोला येथे पश्चिम विदर्भ संयोजक शेख अन्सार यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली पोलिस स्टेशन आणि खदान पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.



महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील वीज ग्राहकांना (जनतेला) काही वचन दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते.  या अत्यंत महत्वाच्या आश्वासनाचा प्रचार त्यांनी व्हिडीओ, पत्रके, भाषणे, ट्विटर अश्या विविध माध्यमातून केला  होता. 


त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचने  पाळणे यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती, परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे. या उलट देशात आणि राज्यात महामारीचे  संकट असतांना १ एप्रिल  पासून वीज दरवाढ करून राज्यातील जनतेला फसवले आहे. 


तसेच रु ३ प्रति युनिट प्रमाणे तयार होणारी विज रु १५ प्रमाणे देवून जनतेची लूट चालू आहे. फसवले गेलेल्या जनतेला घेऊन आम आदमी पार्टीने वीजबिल माफी व किमान वीजदर कपातीची मागणी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे. त्यासाठी सोशल मिडिया वरून मागणी, निदर्शने, इमेल पत्र व पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे वीजबिल माफ करण्याचे वा दर कपातीसाठी हजारो अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिले आहेत. पालक मंत्र्यांच्या घराचा घेराव, वीज कार्यालयांना ताला ठोको अशी आंदोलन केली. 


परंतु, सरकारने यास प्रतिसाद दिलेला नाही. ज्या अर्थी सरकारपक्ष असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री निवडणुकी दरम्यान दिलेले आश्वासन पाठपुरावा करूनही पाळत नाही. त्याअर्थी ही जनतेची जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे. भारतीय दंड संहिता कलम ४१५ ( फसवणूक ) आणि ४२० (अप्रामाणिकपणा - बेईमानी) प्रमाणे हा गुन्हा आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम १२३ (ब) (भ्रष्ट व्यवहारपद्धती) प्रमाणे मते मिळवण्यासाठी खोटी आश्वासने देता येत नाहीत. ही जनतेची फसवणूक ठरते.याच पद्धतीने जर आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असेल तर त्या व्यक्ती वा संस्थेवर IPC ४२० अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतो. 


अशाच प्रकारचे आमिष दाखवून  उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत व आता जाणीवपूर्वक आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारीच्या संकट काळी विजदर वाढवून जनतेसोबत बेईमानी केली आहे. त्यामुळे महामारीच्या संकटामुळे पिडीत आणि फसवल्या गेलेल्या जनतेच्या वतीने राज्याचे  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे  आज २ ऑक्टोबर रोजी सत्याचा आग्रह म्हणून राज्यभरात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही पोलिस तक्रार अकोला येथे पश्चिम विदर्भ संयोजक शेख अन्सार यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली पोलिस स्टेशन आणि खदान पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.

यावेळी आम आदमी पार्टी, अकोला जिल्हा संयोजक अरविंद कांबळे,  शहर संयोजक डॉ खंडेराव दाभाडे, कोषाध्यक्ष  अब्दुल रफीक, सहसचिव काझी लायक अली, सदस्य दिलीप पाटील, शेख रशीद शेख रफुल, व सुरेश सावंत आदी उपस्थित होते. 

टिप्पण्या