Aambadevi sugar:अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू न केलेल्या कंपनीवर कारवाई करून अहवाल तातडीने सादर करावा – नाना पटोले

अंजनगाव येथील अंबादेवी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे अटींच्या अधीन राहून तो मे. कायनेटीक पेट्रोलियम कंपनीस विकण्यात आला. 




मुंबई: अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या अटींवर विकला गेला आहे. मात्र, अटींची पूर्तता न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि बेरोजगार यांच्या समस्या वाढल्या आहेत. संबंधित कारखाना खरेदी केलेल्या कायनेटीक पेट्रोलियम कंपनीवर नियमान्वये कारवाई करण्यात यावी.  कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. संबंधित कारवाईचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


 

आज विधानभवन येथे अमरावती अंजनगाव येथील श्री. अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार बळवंत वानखेडे, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उपसचिव संतोष घाडगे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, अंजनगाव येथील अंबादेवी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे अटींच्या अधीन राहून तो मे. कायनेटीक पेट्रोलियम कंपनीस विकण्यात आला. मात्र, संबंधित कंपनीने अटींनुसार साखर कारखाना पूर्ववत सुरू न केल्याने शेतकरी आणि स्थानिक बेरोजगारांची समस्या निर्माण झाली आहे. अटींची पूर्तता केली नसल्याने संबंधित कंपनीवर नियमान्वये कारवाई करून अहवाल सादर करावा, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.



अमरावतीतील प्रलंबित विषयांबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली.  



जिल्ह्यातील खरेदी विक्री संस्थांनी तूर, हरभरा खरेदी केल्यानंतर त्यांना देय असलेले १ टक्के कमिशन ८ दिवसात अदा करण्याचे आदेश आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. अमरावतीतील कापूस उत्पादक आणि रोजगाराच्या दृष्टीने बंद असलेली दर्यापूरमधील संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणी सुरु करण्यासाठी संबंधित विभागाने लवकरच बैठक लावावी असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 


अमरावती जिल्ह्यातील खरेदी विक्री संस्थांची तूर, हरभरा खरेदीतील १ टक्के कमिशन वेळेवर अदा करणे, अंजनगाव सुर्जीमधील श्री अंबादेवी साखर कारखाना पुन्हा सुरु करणे, बंद असलेली दर्यापूरमधील संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणी सुरु करणे या विषयांवर चर्चा झाली. 


टिप्पण्या