Balasaheb Ambedkar: बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठपुराव्याने आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सरकारची मान्यता

बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठपुराव्याने आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सरकारची मान्यता

मुंबई दि. १०: औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर,सोलापूर, सातारा या आठ जिल्ह्यातील तलाठी (गट-क) भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सामान्य प्रशासन विभागाने विविध कारणे सांगत अडवून धरली होती.त्यावर संबंधित उमेदवारांनी एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांची भेट घेऊन कैफियत  मांडली होती. बाळासाहेबांनी केलेल्या पाठपुरावा ह्या मुळे आठ जिल्ह्यातील  भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली असून अहमदनगर वगळाता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याने संबंधित उमेदवारांनी बाळासाहेब आंबेडकर व पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत. 

सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये २६  जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती,  परंतु ८ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र एड बाळासाहेब आंबेडकर आणि संबंधित उमेदवार ह्यांनी सातत्याने हा विषय लावून धरला होता.ह्या विषयावर एड आंबेडकर ह्यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व सामान्य प्रशासन विभागाच्या संबंधित अधिकारी ह्यांच्याशी चर्चा करून सरकारच्या अन्यायकारक धोरणाची जाणीव करून दिली होती.एड आंबेडकर ह्यांचे पाठपुराव्याने ह्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी लक्ष घातल्याने आता सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे.अहमदनगर जिल्ह्या बाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील  पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून ३१ जुलै रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले उमेदवार धास्तावले होते.त्यामुळे त्यांनी एड आंबेडकर ह्यांची भेट घेऊन सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा पाढा वाचला होता.बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी तात्काळ निर्णय घेण्यास भाग पडल्याने आठ जिल्ह्यातील भरतीचा मार्ग सामान्य प्रशासन विभागाने मोकळा केला. अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा देखील वंचित ने व्यक्त केली आहे. तलाठी गट-क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करणार असल्याने त्यांनी युद्धपातळीवर काम करून ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी वंचीत बहुजन आघाडी ने व्यक्त केली आहे.



टिप्पण्या