Cyber crime::अपहरणाचा नवा प्रकार...मुलांचे होताहे आभासी अपहरण... New type of abduction ... Virtual abduction of children ...

अपहरणाचा नवा प्रकार...मुलांचे होताहे आभासी अपहरण...

                               f i l e p h o t o

*सायबर भामटे मागतात खंडणी

*काय आहे आभासी अपरहरण प्रकार जाणून घ्या


मुंबई दि.१ :- पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे  करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. यामध्ये सायबर भामटे आधी सोशल प्रोफायलिंग (social profiling) करून  शक्यतो अशा जोडप्यांना लक्ष करतात जिथे आई, वडील दोघेही नोकरी करतात आणि त्यांचे पाल्य एकटे असते किंवा त्याच्याकडेपण  मोबाईल असतात.



प्रत्यक्षात अपहरण होत नाही

                                f i l e p h o t o

*सायबर भामटे विविध सोशल मिडियाद्वारे अशा पाल्यांशी मैत्री करतात आणि त्यांचे फोटो , पालकांची माहिती  काढून घेतात . 

*त्यानंतर पाल्यास काही काळाकरिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात, त्याच सुमारास सदर पालकांस  खोटे व्हिडीओ बनवून किंवा फेक फोटो बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा मेसेज पाठवतात . 

*या मेसेजमध्ये पाल्यास सोडविण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात जमा देखील करतात.


*इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसविले जाते. अपहरणाचा आभास निर्माण केला जातो ज्यामुळे घाबरून पालक खंडणी देतात. 


*यामध्ये खंडणी कमी वेळात नमूद बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले असते .पालक घाबरून जाऊन पाल्याच्या सुरक्षिततेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात.


काय काळजी घ्यावी

असे प्रकार हे परदेशात जास्त होत असले तरी , आपण इथे सतर्क राहणे जरुरीचे आहे. 


*तुम्ही तुमच्या पाल्याकडे शक्यतो एकदम साधा फोन द्या ज्यामुळे आपले पाल्य आपल्या नकळत जास्त सोशल मीडियावर वावरणार नाही व सायबर भामट्यांचा संपर्कात येण्याची शक्यता कमी होईल. 


*पालकांनीसुद्धा सोशल मीडियावर वावरताना आपली काय माहिती सोशल मीडियावर प्रसारित करायची याचे तारतम्य बाळगले पाहिजे.


*अशा प्रकारचा अनोळखी मेसेज आला तर शक्यतो त्या अपहरणकर्त्याचा फोनवर संपर्क होतो आहे का याची खात्री करा. अशा प्रकारचे मेसेज आल्यावर आपले पाल्य कुठे आहे किंवा असू शकेल याचा आधी शोध घ्या. आपल्या पाल्याशी सतत संपर्कात राहा.


अशा प्रकारचे मेसेज आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा. असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत करण्यात आले आहे.




Lockdown च्या काळात राज्यात घडलेले सायबर गुन्हे

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.



आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ३१ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

* व्हॉट्सॲप-  २११ गुन्हे दाखल

* फेसबुक पोस्ट्स –  २४६ गुन्हे दाखल

* टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

* ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १८ गुन्हे दाखल

* इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ५ गुन्हे

* अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६६ गुन्हे दाखल

* वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २९० आरोपींना अटक.

*  ११८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

* जळगाव जिल्ह्यातील  शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या विभागातील गुन्ह्यांची संख्या ३७ वर गेली आहे.

* सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर  राजकीय  व धार्मिक वक्तव्य  असणारा व्हिडिओ टाकला  होता. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊन  परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

टिप्पण्या