Chetan Chauhan:जानेवारी २०१४ मध्ये चेतन चौहान आले होते अकोल्यात…

जानेवारी २०१४ मध्ये चेतन चौहान आले होते अकोल्यात…

“पहला सुख स्वस्थ काया” 



उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन रविवारी झाले.कोरोना संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.  त्याच वेळी, मूत्रपिंडाचा देखील संसर्ग वाढला आणि त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात रेफर केले.  रविवारी येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  चौहान ७२ वर्षांचे होते.




अकोला: भारतीय क्रिकेट टीमचे सलामीचे फलंदाज चेतन  चौहान यांचे निधन रविवार १६ ऑगस्ट रोजी झाले. क्रीडा भारतीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. २०१४ च्या आय एम ए वॉकथॉनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून चेतन चौहान अकोल्यात आले होते.त्यांच्या हस्ते वसंत देसाई क्रीडांगण येथे बक्षीस वितरण करण्यात आले होते.



क्रीडा भारतीचे नरेंद्र देशपांडे, प्रसन्न हरदास, दीपक मायी, जितेंद्र पातुरकर, यांनी त्यांना आवर्जून अकोल्याला  बोलावले होते.  कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देवून चेतन चौहान अकोल्यात आले होते. १२ जानेवारी २०१४ रोजी आय एम ए वॉकथोनच्या बक्षीस वितरण समारंभाचे ते प्रमुख पाहुणे होते. यानिमित्ताने दोन दिवस त्यांचे अकोल्यामध्ये वास्तव्य होते.  दोन दिवस वास्तव्यात आचारातील साधेपणामुळे अकोलेकर भारावून गेले होते. वॉकथोनच्या स्पर्धकांशी संवाद साधताना मंचावरून खाली उतरून संवाद साधण्याची कला पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला होता. वॉक थॉन च्या आदल्या दिवशी क्रीडाभारतीच्या वतीने ब्राह्मण सभा येथे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा चौहान यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव केला होता.



"एक वाक्य नेहमी त्यांच्या भाषणात असायचे. ते म्हणायचे

“ पहला सुख स्वस्थ काया 

दूजा सुख घर मे माया “

स्वस्थ कायेचा असा भोक्ता आता आपल्यात नसणे ही दु:खाची बाब आहे."

डॉ प्रशांत मुळावकर 

उपाध्यक्ष,  विदर्भ प्रांत,  क्रीडा भारती






कोरोनाचा झाला होता संसर्ग


११ जुलै रोजी चेतन चौहान यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना लखनऊच्या संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चेतन चौहान यांच्यावर लखनऊ मध्ये जवळपास एक महिना उपचार सुरू होता.  यावेळी,मूत्रपिंडाचा संसर्ग वाढला होता.  यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेंडता रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांना येथे लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते.अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.



क्रिकेटर ते राजकीय नेते

भारतीय क्रिकेट संघात फलंदाज असलेले चेतन चौहान अमरोहा जिल्ह्यातील नौगावा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय भूमिका घेतली होती. योगी सरकारमध्ये ते सैन्य कल्याण, होमगार्ड, पीआरडी, नागरी सुरक्षा विभाग मंत्री होते.


सलामीचे फलंदाज

चेतन चौहान यांनी भारताकडून ४० कसोटी सामन्यांमध्ये २०८४ धावा केल्या.    त्यानी सात एकदिवसीय   आंतरराष्ट्रीय सामन्यात १५३ धावाही केल्या. चौहान आणि सुनील गावस्करची सलामीची जोडी बर्‍यापैकी यशस्वी झाली.१९७०च्या दशकात या दोघांची  १० वेळा शतकीय भागीदारी होती आणि त्यांनी एकत्रितपणे तीन हजारांहून अधिक धावा केल्या.  दिल्ली आणि महाराष्ट्राकडून घरगुती क्रिकेट खेळताना चौहान यांनी बऱ्याच धावा केल्या.


टिप्पण्या