Rajiv Gandhi:राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा

राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा

स्वर्गीय राजीव गांधी स्मृतिदिनानिमित्त  अभिवादन

मुंबई, दि. २१ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, राजीव गांधींनी देशातील दूरसंचार आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी केली. ती आज महत्त्वपूर्ण ठरली आहे. देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या वाटचालीतील राजीवजींचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृतिदिनी दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ घेऊ या. त्यासाठी अविरत प्रयत्न करणे, हीच राजीव गांधींना श्रद्धांजली ठरेल.


राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा – उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले, स्वर्गीय राजीव गांधींसारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले गेले. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीवजींना आहे. आज कोरोनाच्या संकटात अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संवाद साधत आहेत. हे देखील राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाले आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी युवकांना निर्णय प्रक्रियेत संधी दिली. सर्वधर्मसमभाव वाढावा, देशात व उपखंडात शांतता नांदावी म्हणून काम केलं. त्यांचा स्मृतिदिन ‘दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस’ म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दहशतवाद व  हिंसाचार  विरोधी शपथ 

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दहशतवाद व  हिंसाचार विरोधी  दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मंत्री ॲड.अनिल परब यांच्या उपस्थितीत दहशतवाद व  हिंसाचार  विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री  डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासनचे उपसचिव जे.जे.वळवी, कक्ष अधिकारी ललीत सदाफुले, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.         


टिप्पण्या