अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करतांना शेतीकडे लक्ष द्यावे, कोणाचाही पगार कापू नये-प्रकाश आंबेडकर
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर(अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांना निमंत्रित करण्यात आले होते. पुणे येथून ते बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीतील मुद्दे.
संपुर्ण जगावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठं संकट उद्भवले आहे. या संकटकाळातून राज्याला बाहेर काढण्यासाठी व राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील? या संदर्भात चर्चा करण्यात आली. ही संकटाची वेळ आहे यातून राज्याला बाहेर काढणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज मा.मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सरकारला काही विषयांवर सूचना केल्या आहेत. सरकार यावर लक्ष देऊन काम करेल ही अपेक्षा !
१. राज्य सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या जेवणाच्या योजनेत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
२. राज्यातील न्हावी समूह तसेच अलुतेदार- बलुतेदार आर्थिक संकटात आला आहे. त्यांना सरकारने मदत द्यावी.
३. शेतकऱ्यांना बियाणे वाटप करावे, सरकारने कापूस खरेदी थांबवू नये, रब्बीचे पिक शेतकऱ्यांच्या घरात आहे. ते एपीएमसीने विकत घ्यावे.
४. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करतांना शेतीकडे लक्ष द्यावे, कोणाचाही पगार कापू नये.
५. रिक्षा, हातगाड्या, घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत ते पुनर्गठीत करावेत. मजुरांना कमीतकमी वेतन दिलेच पाहिजे ही मागणी आम्ही सरकारकडे केली.
६. सरकारने राज्यात परीक्षा होणार आहेत की नाही? ते स्पष्ट करावे.
७. कुंभार समाजाकडे मातीची रॉयल्टी मागू नये.
८. नाभिक समाजालादेखील दिलासा मिळावा. आदी गोष्टीकडे आम्ही सरकारचे लक्ष वेधले.
अजून एका महत्त्वाच्या गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारने "सोशल डिस्टनसींग" हा शब्द प्रयोग करू नये. त्याऐवजी "फिजिकल डिस्टनसींग" हा शब्द वापरावा. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यावर आलेल्या या संकटात जनतेला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करू. ही सामूहिक लढाई आहे यात आम्ही सरकार बरोबर आहोत.
- प्रकाश आंबेडकर
(अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा