farmer-loan-waiver-bjp-aklola: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफी, 48 हजार कोटींची वीजबिल माफी; अकोल्यातील 73 हजार शेतकऱ्यांना थेट लाभ – आ. रणधीर सावरकर



ठळक मुद्दा 

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटींचा लाभ; अकोला जिल्ह्यात सुमारे 985.41 कोटींची वीज थकबाकी माफ होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा दावा करत, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' आणि 48 हजार कोटी रुपयांच्या वीजबिल थकबाकी माफीचा मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत दिली.

योजनेअंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार असून, पूर्वी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50 हजार रुपयांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. सावरकर यांनी सांगितले की, राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना वीजबिल आकारले जात नसले तरी जुन्या थकीत वीजबिलाचा प्रश्न कायम होता. आता तब्बल 48 हजार कोटी रुपयांची जुनी थकबाकी माफ करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील सुमारे 73 हजार शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून, अंदाजे 985 कोटी 41 लाख रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. संबंधित अधिकृत निर्देश लवकरच प्राप्त होऊन योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


दिवसा वीजपुरवठा शंभर टक्के करण्याचे लक्ष्य

सौरपंप व सौर कृषीवाहिनी योजनांमुळे राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून वर्षअखेरीपर्यंत हा आकडा 100 टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही आ. सावरकर यांनी सांगितले.


महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक विधेयक

संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-2026' आणून देशात आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.


कृषी क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक

राज्य सरकार दरवर्षी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 95 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. राज्यात 136 लाख क्विंटल कापूस खरेदी करून 10,883 कोटी रुपयांचे चुकारे देण्यात आले असून 6 लाख टन सोयाबीनची 3,198 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


'मागेल त्याला शेततळे' योजनेत वाढीव अनुदान

शेततळे योजनेअंतर्गत आता एकूण खर्चाच्या 75 टक्के किंवा कमाल 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असून, प्लास्टिक अस्तरीकरणासाठीही अतिरिक्त अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. जलयुक्त शिवारसारख्या योजनांमुळे अनेक शेतकरी आता वर्षातून तीन पिके घेत असल्याचे त्यांनी सांगितले.


नैसर्गिक शेती आणि नदीजोड प्रकल्पांवर भर

देशी गायींचे संवर्धन, नैसर्गिक शेती, गटशेती, जमिनीची उत्पादकता वाढविणे तसेच वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प, नवीन धरणे आणि जुन्या धरणांची उंची वाढविण्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मनपा कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक विमा योजना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला महानगरपालिकेतील 1,402 अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांसाठी सामूहिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेत—

  • अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण

  • उपचारासाठी 2 लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण

  • पंजाब नॅशनल बँकेकडून प्रीमियममध्ये 25 टक्के सूट

  • संपूर्ण प्रीमियम मनपा प्रशासनाकडून भरला जाणार

अशी माहिती पत्रकार परिषदेत मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी देण्यात आली.


मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा जनकल्याण सप्ताह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्यातील 929 गावांमध्ये सेवा जनकल्याण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

या अंतर्गत—

  • रक्तदान शिबिरे

  • अन्नदान

  • मातृशक्ती सन्मान

  • किचन गार्डन किट वाटप

  • परसबाग किट वितरण

  • शेतकरी सन्मान

  • स्वच्छता अभियान

  • आरोग्य शिबिरे

  • दीपदान

असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, भाजपा नेते जयंत मसने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्दे

  • 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी

  • 48 हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी माफ

  • अकोल्यातील 73 हजार शेतकऱ्यांना लाभ

  • जिल्ह्यात 985.41 कोटी रुपयांची वीज थकबाकी माफ होणार

  • महात्मा फुले योजनेतील लाभार्थ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी

  • 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज; वर्षाअखेरीस 100% लक्ष्य

  • महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026

  • शेततळे योजनेत 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान

  • मनपा 1,402 कर्मचाऱ्यांसाठी 5 लाखांचा सामूहिक विमा

  • 929 गावांत सेवा जनकल्याण सप्ताहाचे आयोजन


News Keywords 

कर्जमाफी 2026, वीजबिल माफी, देवेंद्र फडणवीस, रणधीर सावरकर, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, Akola News, Maharashtra Farmer Loan Waiver, Electricity Bill Waiver Maharashtra, Akola Farmers News



टिप्पण्या