unseasonal-rains-in-akola-city: अकोल्यात अवकाळी पावसाचे थैमान : आ. पठाण यांचे प्रशासनाला तातडीचे निर्देश; मनपाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रोहितचा बळी!




ठळक मुद्दा

आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्व यंत्रणांना एकसंघ काम करण्याचे आवाहन



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोल्यात मंगळवारी झालेल्या पूर्वमोसमी अवकाळी पावसाने शहराची अवस्था दयनीय झाली असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले.


या बैठकीस मनपा आयुक्त सुनील लहाने, उपायुक्त गीता ठाकरे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम तसेच महावितरण, आरोग्य विभाग, मनपा यंत्रणा व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


आ. पठाण यांनी या बैठकीत सांगितले की, "आपल्याकडे यंत्रणा असूनही नागरिकांचे हाल होतात, हे दुःखद आहे. आपत्कालीन कक्षाचा क्रमांक सार्वजनिक करावा, झोननिहाय आणि प्रभागनिहाय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून पीडित नागरिकांना शासकीय मदत मिळवून द्यावी."


शहरात विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. मोहता मिल परिसरात झाड कोसळून चारचाकी वाहनावर पडल्याची घटना घडली, सुदैवाने महिला व बालक सुखरूप बचावले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काळात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने सज्ज राहावे, असेही त्यांनी सांगितले.



महावितरणच्या ढिसाळ नियोजनावरही आ. पठाण यांनी टीका केली. "जर कार्यात गती न आणल्यास आगामी अधिवेशनात मेंटेनन्सच्या नावाखाली खर्च झालेल्या निधीचा हिशोब मागण्यात येईल," असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पंकज गावंडे, मोहम्मद इरफान, मोईन खान, रवी शिंदे, योगेश कळसकर, जावेद जकारिया आदी उपस्थित होते. 







नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा


रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांचे घरांचे टिनपत्रे उडाले, झाडे कोसळून नुकसान झाले. आ. पठाण यांनी या सर्व भागांचे तात्काळ पंचनामे करून संबंधितांना शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले.



 


“मी जनतेचा सेवक” – आ. पठाण यांची रोखठोक भूमिका



"मी जनतेचा सेवक आहे. जनतेला होणारा त्रास खपवून घेणार नाही. सर्व अधिकारी एकत्र येऊन एकसंघपणे कार्य करावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल," तर जनतेच्या पैशावर आपण अधिकारी पदाच्या सर्व सोयीसुविधा उपभोगत आहोत, जर जनतेलाच असुविधा झाल्या तर आपणाला खुर्चीवर बसू देणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. पठाण यांनी यावेळी दिला.





पाणी साचलेल्या भागांची यादी



गंगा नगर, भारत नगर, नायगाव, कौलखेड, खडकी, खैर मोहम्मद प्लॉट, रायली जीन, डाबकी रोड, नायगाव, अकोट फाईल, खदान  शिवसेना वसाहत, अयोध्या नगर, सोनटक्के प्लॉट, रामदास पेठ आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः त्या भागात जाऊन पाहणी करून त्वरित निचऱ्याची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले.




मनपाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रोहितचा बळी : आ. पठाण 


मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी तातडीने मदत द्यावी



मंगळवारी ( दि. २७ मे ) रोजी अकोला येथील अग्रसेन चौक परिसरात रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात पडून भगतसिंग चौकाचे रहिवासी  रोहित संदलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना महापालिकेच्या घोर दुर्लक्षामुळे घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचे शरीर सुमारे अर्धा तास घटनास्थळी पडून होते. नंतर एक ट्राफिक पोलीस कर्मचारी त्यांना जिल्हा रुग्णालयात घेऊन गेला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.


बुधवारी सकाळी अकोला पश्चिम विधान सभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण हे संदलकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या माळीपुरा चौक येथील निवासस्थानी पोहोचले. त्यांनी शोकाकुल कुटुंबाला सांत्वना देत ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.



यावेळी आमदार साजिद खान यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, ही दुर्घटना महापालिकेच्या निष्क्रियतेचे आणि जबाबदारीच्या अभावाचे थेट परिणाम आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीत येतो आणि तरीही अनेक वर्षांपासून या ठिकाणी असलेला मोठा खड्डा भरला गेला नाही. वेळेवर उपाययोजना झाल्या असत्या, तर ही दुर्घटना टाळता आली असती आणि दोन चिमुरड्या मुलींना वडिलांचे छत्र गमवावे लागले नसते.


आमदार साजिद खान यांनी बुधवारी सकाळीच महापालिकेतील संबंधित विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली, कारण ही घटना त्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे. तसेच, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, रोहित संदलकर यांच्या कुटुंबीयांना त्वरित शासकीय मदत दिली जावी. त्यांनी विशेष मदतीच्या पॅकेजची मागणी करताना हे देखील सांगितले की, या कुटुंबाची आर्थिक व सामाजिक सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे.



या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील. असेही यावेळी आ. पठाण यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.

टिप्पण्या