भारतीय अलंकार 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोसमी पूर्व पाऊस मुक्कामाला आहे. या पावसाने शेती आणि मातीचे नुकसान केले आहे. शहरात मंगळवार 27 मे रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारा सुरू झाला. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होऊन रात्रभर मुक्कामास होता.
शहरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्यांना तलावाचे रूप आले होते तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना रात्र जागून काढावी लागली.
यावर कहर म्हणजे जिल्हा स्त्री रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहात सुद्धा पाणी शिरले होते.वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर वृक्ष पडले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मान्सून पूर्व नालेसफाई नसल्यामुळे नाले तुडुंब भरले होते. जेसीबी व सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने नाल्यांचे पाणी वाहते करण्यात आले. शहरात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मनपाचे झोन कार्यालये आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मोटर वाहन विभाग हे 24 तास सुरू ठेवण्यात आले.
वीज पुरवठा खंडित
शहरातील विशालकाय वृक्ष वीज वाहिन्यांवर कोसळल्याने शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. वृक्ष बाजूला करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धस्तरावर करवाई करण्यात आली. काही भागातील वीज पुरवठा 12 तासांहून अधिक काळापासून खंडित असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
शेतीचे नुकसान
अकोला जिल्ह्यातील 27 व 28 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे 155 गावातील 3076 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. या पावसामुळे उन्हाळी कांदा, भुईमूंग, ज्वारी, उडीद, आंबा, लिंबू, केळी, मका, तीळ, मुग, पपई आदी पिकांना मोसमी पूर्व पावसाचा मोठा फटका बसला आहे. अकोला तालुक्यातील 29 गावातील 478 हेक्टर, अकोट तालुक्यातील 14 गावातील 470 हे. आर. , मूर्तिजापूर मधील 22 गावातील 188.5 हेक्टर, बाळापुरातील 49 गावातील 350 हे. बार्शिटाकळी मधील 2 गावातील 80 हेक्टर, पातुर तालुक्यातील 57 गावांमध्ये 1526 हेक्टर तर तेल्हारा गावातील 5 गावातील 55 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. तर 22 घरांची पडझड झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोघांचा मृत्यु!
काल झालेल्या मुसळधार पावसात अग्रसेन चौकातून सायकलने जात असताना एका व्यक्तीचा स्पीड ब्रेकरमुळे रस्त्यावर पडून मृत्यु झाल्याची घटना घडली. रोहित धर्मराज संदलकर असे या व्यक्तीचे नाव असून, माळीपुरा येथील रहिवासी असल्याचे कळते. तर दुसरी घटना मासूम शाह दर्ग्या जवळ बुधवारी सकाळी मोर्णा नदी काठावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच घळबळ उडाली होती. हा मृतदेह पावसामुळे वाहत आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या व्यक्तीचे अद्याप ओळख पटलेली नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा