farmers-aggressive-for-seeds: बियाण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी झाले आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या अकोल्यात शेतकऱ्यांचा जोरदार संघर्ष सुरू आहे. रात्रीपासून कृषी सेवा केंद्र समोर रांगा लावून उभे असलेल्या शेतकऱ्यांना बियाण मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज टिळक मार्गावर एकजुटीने रास्ता रोको आंदोलन केले.



खरीप हंगामाला काही दिवसातच सुरुवात झाली असून याकरिता शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करिता लगबग सुरू आहे, यातच अकोला शहरासह जिल्हयातील काही कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. आज अकोला शहरातील टिळक रोड वरील एका कृषी केंद्रावर शेतकऱ्याची आक्रमक भूमिका पहायला मिळाली. सदर कृषी केंद्र उघडले नसल्याने शेतकऱ्यांनी थेट मुख्य रस्त्यावर येत आंदोलनाची भूमिका घेत जोरदार नारेबाजी केली. तर यावेळी कपाशीच्या बियाण्याची विक्री ब्लॅक मध्ये होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. याबाबत माहिती मिळताच शहरातील पोलिसांचा ताफा घटना स्थळी पोहचून त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपली नारेबाजी सुरू ठेवली. या बाबतची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक यांनी भेट दिली. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना घेराव घालत, आपली व्यथा मांडली. तर जो पर्यंत कपाशीचे बियाणे मिळत नाही तो पर्यन्त आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली होती. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये सुद्धा शाब्दिक बाचाबाची झाली. शेतकऱ्यांचा रोष पाहता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पसंतीच्या बियाण्याची मागणी अधिक करण्यात आली होती. मात्र कंपनीचा उत्पादन निष्फळ झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचं शंकर किर्वे , कृषी अधीक्षक, अकोला यानी म्हंटले.









दुकानांची झडती



कापसाच्या बियाण्यांसाठी आज अकोल्यात शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला होता. बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.तर दुकानदाराकडे बियाण्याचा साठा असूनही माल देत नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना घेराव घातला होता. तर यावेळी शेतकरी दुकानदाराच्या दुकानाची  झडती घेण्यासाठी ठाम राहिले. तर दुसरीकडे कृषी सेवा केंद्र संचालकांनीही जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था दुरुस्त होत नाही तोपर्यंत प्रतिष्ठान उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.शेवटी कृषी सेवा केंद्र संचालक आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पाहता जिल्हा प्रशासनाने दुकानदारांच्या दुकानाची झडती घेतली. मात्र पसंतीच्या बियाण्याचा एकही पाकीट दुकानात न आढळल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष मावळला. शेतकरी आणि कृषी केंद्र संचालकांच्या या संघर्षानंतर अकोला कृषी अधीक्षक यांनी विशिष्ट कंपनीच्या या बियाण्याची विक्री आजच करावी आणि उद्यापासून जर कोणाच्या दुकानात या बियाण्याचा पाकीट आढळून आल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

टिप्पण्या