Political :BJP: ramdas tadas: शेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव; भाजप सांसद रामदास तडस यांचे टीकास्त्र




अकोला:  ठाकरे सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून, केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले संरक्षण काढून घेऊन सामान्य शेतकऱ्याची मान पुन्हा दलालांच्या कचाट्यात अडकविण्याचा डाव आहे, अशी टीका भाजपचे खासदार रामदास तडस यांनी एका आभासी बैठकीत केली. 




या प्रस्तावित सुधारणांमुळे पुन्हा दलालांना मोकळे रान मिळणार असून, त्यांचे खिसे भरण्याचा राज्य सरकारचा हेतू असल्याने सुधारणा मंजूर न करता केंद्राचे कृषी कायदे जसेच्या तसे स्वीकारले पाहिजेत, अशी मागणीही रामदास तडस यांनी केली आहे. 




राज्य सरकारने मांडलेल्या तीन कायद्यांवर दोन महिन्यांत जनतेची मते मागविली आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारचे कायदे फेटाळण्या ऐवजी काही सुधारणा सुचविल्या असल्या तरी, केंद्राने केलेल्या तीनपैकी दोन कायदे महाराष्ट्रात आधी पासूनच अस्तित्वात होते. हमीभावापेक्षा कमी भावाने विक्री संदर्भात शेतकऱ्यांना संरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणेत ही बाब स्वीकारण्यात आली आहे. मात्र, शेतकरी व पुरस्कर्ता हे परस्पर संमतीने दोन वर्षाच्या कालावधी करिता किमान आधारभूत किमतीहून कमी किमतीचे कृषी करार करू शकतील, असे राज्य सरकारच्या प्रस्तावित सुधारणेत म्हटले आहे. ही बाब म्हणजे, शेतकऱ्याच्या नाडवणुकीसाठी दलालास मोकळे रान देण्याची पळवाट आहे, असे तडस म्हणाले.



दोन वर्षाचे करार कितीही वेळा शेतकऱ्या सोबत करता येण्याच्या या छुप्या तरतुदी मुळे हमीभाव पेक्षा कमी भावाने खरेदी करण्याची मुभा व्यापाऱ्यास मिळणार आहे. ज्या पिकांकरिता हमीभाव नाही, त्या पिकांकरिता शेतकरी व व्यापारी परस्पर समतीने कृषी करार करू शकतील असेही म्हटले असले, तरी त्यामध्येही राज्य सरकारने पळवाट ठेवली आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियमात सुचविलेल्या सुधारणे नुसार हा कायदा शिथिल करण्याचे अधिकार केंद्रासोबत राज्य सरकारलाही मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे तीनही कायदे सरकारने मान्य केलेल्या असल्याने, एवढे दिवस केंद्राचे कायदे मान्य करण्यात केवळ अडवणूक करण्याचे राज्य सरकारचे धोरण स्पष्ट झाले आहे, असेही भाजपा कार्यकर्ते सोबत संवाद साधताना तडस यांनी म्हटले आहे.





राज्यातील बहुतांश दलाल हे राष्ट्रवादी व काँग्रेसचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण करून शेतकऱ्यांना  वाऱ्यावर सोडण्याचा ठाकरे सरकारचा इरादा हाणून पाडण्यासाठी भाजप तीव्र संघर्ष करेल, यासाठी भाजप कार्यकर्ते व शेतकरी सज्ज असल्याचा त्यांनी संवाद कार्यक्रमात असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या